तुरीचा उतारा आला निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST2021-02-05T08:18:04+5:302021-02-05T08:18:04+5:30
बलसूर परिसरात तुरीच्या राशी सुरू : केलेला खर्चही हाती पडणे झाले मुश्कील बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरातील ...

तुरीचा उतारा आला निम्म्यावर
बलसूर परिसरात तुरीच्या राशी सुरू : केलेला खर्चही हाती पडणे झाले मुश्कील
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरातील व्हंताळ, कडदोरा, रामपूर, काळनिंबाळा, कलदेव निंबाळा, जकेकूर, एकुरगा, येळी आदी गावात तुरीच्या राशींना आता वेग आला आहे. मात्र, एकरी सहा ते सात क्विंटल उतारा अपेक्षित असताना प्रत्यक्षात तीन ते चार क्विंटल उतारा पडत असून, यातून झालेला खर्चही हाती पडणे मुश्कील झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी अशा सततच्या संकटाचा सामना केल्यानंतरही हताश न होता शेतकऱ्यांनी जोमाने खरीपातील पेरण्या केल्या. बलसूरसह परिसरात यंदा जवळपास १४०० हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. याच्या पेरणीनंतर सुरुवातीला पिकांना उपयुक्त असा पाऊस पडल्याने पिके जोमात होती. मात्र, त्यानंतर दोन महिने पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली. शिवाय, योग्य अशी फळधारणाही झाली नाही. त्यातच रोगराईचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशक फवारणी केली. परंतु, पाऊसच नसल्याने त्याचाही उपयोग झाला नाही.
सध्या परिसरात तुरीच्या राशी सुरू असून, एकरी केवळ तीन ते चार क्विंटलचा उतारा पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे निघणाऱ्या उत्पादनातून खते, बियाणे, खुरपणी, मजूर, कीटकनाशक आदींचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
चौकट.....
...तर परिस्थिती आणखी कठीण होईल
तुरीचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तीन ते चार क्विंटल उत्पादन निघत आहे. बाजारात तुरीला ५ हजार ९०० रुपये दर असला तरी निघणाऱ्या उत्पादनातून पेरणीपूर्व मशागत, पेरणी, खते, बियाणे, आंतर मशागत, खुरपणी, कापणी, भरडणे आदी खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. त्यात मालामध्ये दोष काढून व्यापाऱ्यांनी भाव कमी केल्यास परिस्थिती आणखी कठीण होणार आहे.
कोट.....
हाताशी आलेले सोयाबीन गेले. यानंतर तुरीवर फळ धारणेच्या पहिल्या भारामध्ये पाऊस नसल्याने फुले गळाली. दुसऱ्या भारात धुक्यामुळे फुले गळून फळ धारणा झाली नाही. यामुळे तुरीच्याही उत्पादनात मोठी घट झाली असून, मिळालेल्या उत्पन्नातून पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्चही निघणार नाही.
- मनोज हिंगमिरे शेतकरी बलसूर.