पंधरा दिवसांपासून तीन रोहीत्र नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST2021-09-22T04:36:39+5:302021-09-22T04:36:39+5:30
ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या ...

पंधरा दिवसांपासून तीन रोहीत्र नादुरूस्त
ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला.
जोतिबाचीवाडी हे गाव उस्मानाबाद-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून, या गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात आहे. वीज वितरण कंपनीच्या येथील उपकेंद्रमधून या गावासाठी वीज पुरवठा केला जातो. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी साळुंखे वस्तीजवळ सिंगल फेजचे १५ केव्हीए क्षमतेचे तीन रोहीत्र बसविण्यात आले आहेत. परंतु, पंधरा दिवसापूर्वी हे तिन्ही रोहीत्र जळाल्याने गणपती, महालक्ष्मी या सणाच्या कालावधीमध्ये गावात अंधाराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या एका थ्री फेज ट्रान्सफार्मरवरून कधी दिवसा तर कधी रात्री फक्त आठ तास वीज पुरवठा होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दरम्यान, काही वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली असता अगोदर आपल्याकडे थकित असलेले वीज बिल भरा व त्यानंतर सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, असे अजब उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
चौकट........
कारवाईची मागणी
सिंगल फेजचे रोहीत्र बदलण्यासाठी काढून दुरुस्तीसाठी पाठविल्यानंतर यंत्रणेकडून पुन्हा नादुरुस्त व खराब रोहीत्र मिळत असून, बदलून आणलेले रोहीत्र बसवताच त्यामध्ये लगेचच बिघाड होत आहे. पंधरा दिवसात दोन वेळा रोहीत्र बदलून आणले तरीही अंधार कायम आहे. त्यामुळे दोषपूर्ण रोहीत्र पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे यांनी केली आहे.