उपजिल्हा रुग्णालय, ट्राॅमा केअरला पुन्हा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:27 IST2021-01-15T04:27:09+5:302021-01-15T04:27:09+5:30
कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन ...

उपजिल्हा रुग्णालय, ट्राॅमा केअरला पुन्हा ठेंगा
कळंब : उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतरण व ट्राॅमा केअर हॉस्पिटलचा प्रश्न शासन दरबारी निकाली निघेल, ही कळंबकरांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या सुविधेसाठी कळंबकरांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.
कळंब ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यानंतर नगर परिषदेने अधिक सुविधांसाठी या रुग्णालयाशेजारील जवळपास दीड एकर जागा रुग्णालयाला दिली. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून मंत्रालयात मंजुरीअभावी पडून आहे. त्यामुळे कळंब रुग्णालयाची अवस्था ‘नाव सोनुबाई...’ या म्हणीप्रमाणे झाली आहे. रुग्णालयाला उपजिल्हा हा दर्जा मिळाल्याने याठिकाणी विविध वैद्यकीय सोयी सुविधा मिळतील, अशी कळंब शहर व शेजारील बीड, लातूर जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा होती. त्यामुळे खासगी दवाखान्यातील खर्चिक उपचारांना आळा बसेल, अशीही भावना होती. परंतु, रुग्णालयात आल्यावर फक्त नाव बदलले, व्यवस्था नाही, असा अनुभव रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येत आहे.
कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणासाठी तत्कालिन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मंत्रालय स्तरावर अनेकदा पत्र देऊन पाठपुरावा केला. विद्यमान आमदार कैलास पाटील यांनीही याविषयी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दरबारात मांडला होता. असा सर्वपक्षीय रेटा असतानाही उपजिल्हा रुग्णालयाची फाईल कोठे चिटकून बसली आहे? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
चौकट -
स्थगिती झटक्यात, हस्तांतरण बासनात!
कळंब नगर परिषदेमधील विकासकामांवर स्थगिती आणण्याची व हटविण्याची मंत्रालयातील फाईल वेगाने फिरली. तसा रेटाही दोन्हीही बाजूने लावण्यात आला होता. दोन्ही पक्षांनी व स्थानिक नेत्यांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व ट्राॅमा केअरचा प्रश्न तसाच प्रतिष्ठेचा करून सर्वपक्षीय मंडळींनी ही फाईलही त्याच वेगात पळवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.
चौकट -
विकासाचे राजकारण अपेक्षित
कळंब तालुक्यातील राजकारणाची सुत्रे आता जिल्ह्याबाहेरून हालत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीचे निर्णय उमरगा येथून, तर सेना - भाजपची सुत्रे उस्मानाबाद येथून हलविली जात आहेत. त्यामुळे कळंबचा आवाज शासनदरबारी थेट जाण्याऐवजी उमरगा किंवा उस्मानाबादमार्गे जातो आहे. तो जातो की नाही, याचीही खात्री स्थानिक नेत्यांना नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून राजकारण करताना ते विकासासाठी करा, अशी अपेक्षाही कळंबकरातून व्यक्त होते आहे.