जिभेचे लाड थांबवा, मसालेदार पदार्थामुळे होऊ शकतो अल्सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST2021-09-03T04:34:16+5:302021-09-03T04:34:16+5:30
उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट ...

जिभेचे लाड थांबवा, मसालेदार पदार्थामुळे होऊ शकतो अल्सर!
उस्मानाबाद : धावपळीच्या युगात अनेक जण वेळेवर जेवणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच काही जण जिभेचे चोचले पुरविण्याकरिता मसालेदार, तिखट पदार्थ खात आहेत. या पदार्थ्यांमुळे पोटाच्या अल्सरचा धोका उद्भवत आहे. त्यामुळे नागरिकांनी तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत, असा तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक व्यक्ती वेळेवर जेवण करीत नाहीत. काही जण जिभेचा लाड पुरविण्याकरिता बाहेर हॉटेलातील चटपटीत व मसालेदार, तिखट पदार्थ खाण्यास पसंती देत आहेत. शिवाय, तळलेल्या पदार्थांकडे अनेकांचा कल वाढला आहे. या पदार्थांमुळे अनेकांना पोटाचा त्रास उद्भवत आहे. पोटाच्या अल्सरचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त तेलकट, मसालेदार व तिखट खाणे टाळावे, असे डॉक्टरांनी सांगितले.
काय आहेत लक्षणे....
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजनात अचानक घट होणे
उलट्यातून रक्त पडणे
मळमळ होणे
पोटात आग पडणे
उदास वाटणे
काय काळजी घेणार
चटपटीत व लज्जतदार पदार्थ खाण्याचा अनेकांना मोह आवरत नसतो. मात्र, अशा पदार्थांच्या खाण्यामुळे पोटाचे आजार वाढत आहेत.
तिखट, मसालेदार पदार्थांमुळे पोटाचा अल्सर वाढत आहे. ही समस्या सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आढळून येत आहे. घाईगडबडीचे आयुष्य असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून यतो.
आरोग्याच्या दृष्टीने तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळणे, व्यसनापासून दूर राहणे, जागरण टाळणे, ध्यानधारणा करण्याने या आजारावर नियंत्रण मिळता येणे शक्य असते.
सकस आहाराबरोबरच नियमित व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पौष्टिक आहाराच महत्त्वाचा
मसालेदार, तिखट पदार्थांमुळे पोटाच्या समस्या उद्भवत आहेत. अवेळी जेवण, व्यसनामुळे या आजाराचा त्रास होतो. हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी पौष्टिक आहार घेणे, ध्यानधारणा करणे, सोबतच सिगारेट, तंबाखूचे व्यसन सोडणे महत्त्वाचे आहे. ओ-पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळून येत आहे.
-डॉ. राज गलांडे, जनरल फिजिशिन
उपाशी राहणे, तिखट, मासलेदार पदार्थांचा अधिक प्रमाणात आहारात समावेश असणे यामुळे अल्सरचा त्रास जाणवू लागतो. आजार टाळण्याकरिता वेळेवर जेवणे, जागरण टाळणे महत्त्वाचे आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना अल्सरचा त्रास जाणवत असतो.
-डॉ. एन. बी. गोसावी, जनरल फिजिशिन