उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST2021-03-15T04:29:03+5:302021-03-15T04:29:03+5:30
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून काेरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता ...

उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून काेरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी घरात बसणे पसंत केल्याने बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते; मात्र मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कायम होती. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसेच या काळात संचारबंदीही लागू केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी शहरात फिरुन दुकाने न उघडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तर नागरिकांनीही घरातच बसणे पसंत केले. त्यामुळे सकाळपासून शहरातील राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरु चौक परिसरातील दुकानांचे शटर डाऊन होते. त्याचबरोबर शहरातील मुख्यरस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत होता. या कर्फ्यूमधून दवाखाने, औषधी दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. मात्र शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसभरात वाहनधारकांची वर्दळ पाहावयास मिळाली.
सलग दुसऱ्या मार्चमध्ये बंद
गेल्यावर्षी मार्च महिन्यात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी जनता कर्फ्यूनंतर आता पुन्हा यंदाच्या मार्च महिन्यातही उस्मानाबादेत जनता कर्फ्यू जाहीर झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी लग्नसराई, धान्य खरेदीच्या काळात उस्मानाबादेत कडकडीत बंद पाहावयास मिळाला.
बसस्थानकातही गर्दी कमी
जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले. त्यामुळे बसस्थानकातही गर्दी कमीच होती. स्थानकातून प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडण्यात येत होत्या.