मुरूम : मुरुम फाटा ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गाचे काम ३ सप्टेंबरपूर्वी सुरु करा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उमरगा येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला आहे.
उमरगा तालुक्यातील मुरूम मोड ते आलूर जिल्हा सरहद (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. २४२) हा रस्ता रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब म्हणून घोषित झाला होता. सध्या या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघात होत आहेत. विशेषतः या मार्गावरील मुरूम शहर ते आलूर पर्यंतचा रस्ता सुधारण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी २०१९-२०२१ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ६ कोटी ५० लक्ष रुपये इतका निधी मंजूर करून घेतला होता. परंतु, हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केल्याचे कारण दाखवून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नाहरकत मिळाली नाही. परिणामी सदर निधी अखर्चित राहिला व रस्त्याची दिवसेंदिवस दुरवस्था होत गेली.
सध्या या मार्गाच्या सुधारणेसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाद्वारे एकूण २९ किमी. लांबीच्या रस्ता सुधारणेसाठी ६६ कोटी ७२ लाख लक्ष रुपये मंजूर असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असे असतानाही कामास मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत तत्काळ कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी मुरुम-अक्कलकोट रस्त्यावर झोपडपट्टी जवळ तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव शहापुरे यांनी निवेदनात दिला आहे. माजी तालुका उपप्रमुख शेखर मुदकण्णा, रणधीर पवार , बळीराम सुरवसे, सरपंच बलभीम पटवारी, आप्पासाहेब पाटील आदींच्या शिष्टमंडळाद्वारे हे निवेदन देण्यात आले.