समिती व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा जादा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST2021-08-27T04:35:28+5:302021-08-27T04:35:28+5:30
तुळजापूर : येथील कृषी उत्पन्न समितीत आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर दिला जात आहे. तसेच ...

समिती व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा जादा दर
तुळजापूर : येथील कृषी उत्पन्न समितीत आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर दिला जात आहे. तसेच शेतमाल खरेदी व्यवहार हा रोख व पारदर्शक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीत विकावा, असे आवाहन सभापती विजय गंगणे यांनी केले.
गुरुवारी बाजार समिती कार्यालयात सभापती विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सद्यस्थितीत मूग, उडीद या शेतमालाची आवक सुरू झाली असून, येथील व्यापारी शासकीय भावापेक्षा जादा दराने शेतमाल खरेदी करीत आहेत. सद्यस्थितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ ते नऊ हजार रुपये तर तुरीला साडेसहा ते सात हजार रूपये दर दिला जात आहे. उडीद, मूग या शेतमालाला हमीभावापेक्षा शंभर ते दोनशे रुपये जास्त भाव मिळत असल्याचे ते म्हणाले. तुळजापूर बाजार समितीतील आडत व्यापारी लातूर व सोलापूर या ठिकाणच्या बाजार समिती भावाप्रमाणे शेतमाल खरेदी करीत आहेत. तसेच रोख रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ दिली जात आहे. इतरत्र खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समिती व्यापाऱ्यांकडे विक्री करावा व योग्य मोबदला घ्यावा. कोणी आडत व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल तर त्यांनी बाजार समितीशी संपर्क करावा, असे आवाहन ही गंगणे यांनी केले. यावेळी बाजार समिती सचिव उमेश भोपळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकल्यावर संबंधित व्यापाऱ्याकडून पक्की पावती घ्यावी. त्यामुळे भविष्यात शासनाने अनुदान जाहीर केले तर याचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो.