ग्रंथप्रदर्शनात दीड कोटीची ‘साहित्य संपदा’ खरेदी; उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 03:03 IST2020-01-13T03:03:19+5:302020-01-13T03:03:29+5:30

आर्थिकदृष्ट्या पिछाडलेल्या जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी दाखविली वैचारिक सुबत्ता, अनेक ग्रंथांचा तुटवडा

Purchase one and a half crore 'material possessions' in the book exhibition; Spontaneous response | ग्रंथप्रदर्शनात दीड कोटीची ‘साहित्य संपदा’ खरेदी; उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथप्रदर्शनात दीड कोटीची ‘साहित्य संपदा’ खरेदी; उत्स्फूर्त प्रतिसाद

सूरज पाचपिंडे 

उस्मानाबाद : मागास व दुष्काळी जिल्हा म्हणून भाळी शिक्का असलेल्या उस्मानाबादेत ११ ते १३ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेनात एकाच छताखाली सुमारे दोनशेच्या आजपास ग्रंथ विक्रीसाठीचे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलवर मिळून सुमारे दीड कोटींची पुस्तके साहित्य रसिकांनी खरेदी केली.

उस्मानाबादेत संमेलन घेण्याचा मान मिळावा, यासाठी साधारणपणे मागील दहा ते बारा वर्षांपासून साहित्य परिषद व सामाजिक संस्था, संघटना पाठपुरावा करीत होत्या. परंतु, एक-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ आणि मागासलेपणावर बोट ठेवले जात होते. त्यामुळे स्पर्धेतील अन्य जिल्ह्यास संधी मिळत गेली. परंतु, यंदा तो मान उस्मानाबादला मिळाला. संयोजन समितीसोबतच सर्व क्षेत्रातील घटकांनी एकत्र येत तगडे नियोजन केले आणि संमेलन नेटके झाले.

दरम्यान, संमेलनस्थळी एकाच छताखाली सुमारे १९७ ग्रंथस्टॉल उभारण्यात आले होते. परंतु, दुष्काळी जिल्हा असल्याने पुस्तकांची अपेक्षित विक्री होईल का नाही, याची चिंता विक्रेत्यांना होती. परंतु, त्यांची ही चिंता वाचकप्रेमींनी फोल ठरवित, पहिल्याच दिवसापासून पुस्तक खरेदीचा सपाटा लावला. बाल साहित्यासह, महापुरुषांचे जीवन चरित्र आदी पुस्तकांना अधिक पसंती होती, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. ग्रंथप्रदर्शनात छोट्या स्टॉलची संख्या सुमारे ४० ते ५० च्या घरात होती. या स्टॉलवर प्रत्येकी सरासरी २५ ते ६० हजारापर्यंत विक्री झाली. तर उर्वरित मोठ्या स्टॉलवर प्रत्येकी साधारपणे ४ ते ७ लाखांची पुस्तक विक्री झाली. सर्व स्टॉलवर मिळून जवळपास दीड कोटींची पुस्तके विक्री झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वाचकांकडून ययाती, मृत्यूंजय, श्रीमान योगी, संभाजी, तुकाराम गाथा, बिहार ते तिहार कन्हैया कुमार, गांधीनंतरचा भारत, पानिपत, सर्वोत्तम भुमीपूत्र गौतम बुध्द आदी पुस्तकांना वाचकांनी अधिक पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या पुस्तकांसोबतच ‘भारतीय संविधान’लाही अधिक मागणी होती.

‘श्यामची आई’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हातोहात संपले़़़
साने गुरुजी यांचे आत्मचरित्र श्यामची आई पुस्तकास विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी होती़ बहुतांश पुस्तक विक्रेत्यांकडील श्यामची आई या पुस्तकाच्या प्रती दुसºया दिवशीच संपल्या. संमेलनाच्या तिसºया दिवशी अनेकांना हे पुस्तक मिळाले नाही़ तर महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाची विक्रीही हातोहात झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़

४८ विक्रेत्यांशी केली चर्चा...
संमेलनस्थळी सुमारे १९७ विक्रेत्यांनी स्टॉल उभारले होते. यापैैकी जवळपास ४८ विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सुमारे दीड कोटी रूपयांची पुस्तके विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबाद शहरात साहित्य संमेलन होत असल्याने पुस्तकांची विक्री होईल की नाही, या चिंतेत आम्ही होतो. मात्र, या ठिकाणी स्टॉलवर अपेक्षेपेक्षा अधिक विक्री झाली़ यात तरुणांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे पुस्तक विक्रेते धनंजय माने म्हणाले़

Web Title: Purchase one and a half crore 'material possessions' in the book exhibition; Spontaneous response