मनाई आदेश झुगारला, ५०० रुपये दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST2021-02-12T04:30:42+5:302021-02-12T04:30:42+5:30
उस्मानाबाद येथील अल्लाउद्दीन रसूल बागवान यांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी रोग प्रसाराची शक्यता निर्माण करून नियमांचे उल्लंघन ...

मनाई आदेश झुगारला, ५०० रुपये दंडाची शिक्षा
उस्मानाबाद येथील अल्लाउद्दीन रसूल बागवान यांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी रोग प्रसाराची शक्यता निर्माण करून नियमांचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बागवान यास ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
३२६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकास शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहतूक नियम मोडणाऱ्या ३२६ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ८० हजार ८०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आली.
दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
उस्मानाबाद : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. हा अपघात ८ फेब्रुवारी रोजी उमरगा येथे झाला.
आळंद तालुक्यातील किणी (सुलतान) येथील विजयकुमार कमलापुरे हे ८ फेब्रुवारी रोजी उमरगा बसस्थानक रस्त्यावर चालत जात होते. यावेळी आळंद तालुक्यातील जागमा येथील कल्याणी भिमशा हडपत याने दुचाकी क्र. केए- ३२ ईडब्ल्यू- ८५०७ निष्काळजीपणे चालवून कमलापुरे यांना जोराची धडक दिली. या अपघातात कमलापुरे यांचा डावा हात मोडला. असा जबाब विजयकुमार कमलापुरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरून कल्याणी हडपत यांच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जुन्या भांडणावरून दाम्पत्यास मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी दाम्पत्यास बेदम मारहाण केली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी कळंब तालुक्यातील मंगरुळ येथे घडली.
केज तालुक्यातील सावरगाव (बोरी) येथील विष्णू बब्रुवान पौळ व त्यांची पत्नी मंगरुळ येथे ६ फेब्रुवारी रोजी आले होते. यावेळी मंगरुळ येथील किसन बाबूराव कांबळे व शहाजी कांबळे यांनी त्या दाम्पत्यास जुन्या भांडणाच्या कारणावरून दगड, काठीने मारहाण केली, असा जबाब विष्णू पौळ यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरून उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला.