उमरगा येथील १३२ उपमुख्य केंद्रातून येणेगूर, बलसूर व सास्तूर येथील तीन ३३ केव्हीए उपकेंद्रास वीज पुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री वादळी वाऱ्याने उमरगा शहरातून गेलेले ३३ केव्हीए वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवारी रात्री नऊ वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. बलसूर व येणेगूर येथील उपकेंद्रातील २२ गावांतील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. विशेष म्हणजे उमरगा येथून जोडण्यात आलेल्या ३३ केव्हीए वाहिनीवर तीन उपकेंद्रांना जोडण्यात आल्याने अतिभारामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. त्याकरिता येणेगूर, बलसूर, सास्तूर उपकेंद्रासाठी वेगवेगळी वाहिनी जोडून देण्याची मागणी होत आहे.
उपकेंद्राचे शाखा अभियंता एम. ए. ठाकूर, श्रीकांत कुंभार, रवी कोठारे, विष्णू जगदाळे, महादेव बनसोडे, दीपक शेंबडे, मोहन गुरव, राहुल पुरंत, राजू निंगणमोडे, गोविंद रणखांब, राम गरड, लदाफ, आदींनी रात्रभर फिरून शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.