उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरून मांजरा नदी वाहते. येथे मांजरा नदीवर गेल्या २५ वर्षांपूर्वी संगमेश्वर मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या खाली अवघ्या एका किलोमीटरवर मांजरा नदीवर पाटबंधारे विभागाने पुलाचे बांधकाम केले आहे. या पुलाच्या डाव्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर पिंपळगाव घाट, उजव्या बाजूला पाचशे मीटरवर पांढरेवाडी ही गावे आहेत; परंतु पांढरेवाडीहून पिंपळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढरेवाडी गावातील सांडपाणी रस्त्याच्या मधोमध सोडले जात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले असून, पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. तसेच या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.
बीड जिल्ह्यातील वाढवणा, पिंपळगाव घाट, मानेवाडी, रुईगव्हाण येथील नागरिक बाजारपेठ जवळ असल्याने खरेदी-विक्रीसाठी येतात; परंतु या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या लोकांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.