तुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागरण-गोंधळ घालून सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे, असे साकडे तुळजाभवानी मातेला घातले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसरा टप्प्यास मंगळवारी तुळजापूरातुन प्रारंभ झाला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले आहेत. सकाळी जागरण गोंधळ घालून या आंदोलनास प्रारंभ झाला. विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशअध्यक्षा चित्राताई वाघ, पदमसिंग पाटील, आमदार राणा जगजीत सिंग, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार दीपक आबा साळुंके, आमदार विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया, संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सोनाली देशमुख, आमदार रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थिती होती. दरम्यान, तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देखील देण्यात आले