जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-29T23:50:48+5:302014-05-30T00:26:28+5:30
तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते.

जनजीवन विस्कळीत
तामलवाडी : अवकाळी पाऊस वादळी वार्याच्या तडाख्याने हतबल झालेल्या तुळजापूर तालुक्यातील केमवाडी गावचे जनजीवन गुरुवारी विस्कळीत झालेले होते. घरावरील पत्रे उडून घरात साचलेल्या पाण्यातच महिलांना स्वयंपाक करावा लागला. नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली गावकरी वावरत होते. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्यासाठी चार तलाठी कर्मचार्यांना केमवाडीत दाखल केले. दिवसभर पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. बुधवारी दुपारी ३ वाजता वादळी वार्याने केमवाडी येथे थैमान घातले. गारांच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५० घरावरील पत्रे उडाल्याने घरात आडोसा नव्हता. चिखलात चूल पेटवून स्वयंपाक करावा लागला. तर घरासमोरील उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम चालू होते. विजेचे खांब पडल्याने गेल्या ३० तासांपासून गावचा वीज पुरवठा खंडित झाला असून, पाणीपुरवठाही बंद पडला आहे. वादळात उडालेले पत्रे सापडत नसल्याने घर कसे झाकावे या विचारात संतोष शिंदे कुटुंबिय होते. वादळी पावसात विश्वनाथ शिंदे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले होते. उभ्या आयुष्यात असले वादळी वारे पाहिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद शाळेवरील पत्रेही वार्याने उडून गेले आहेत. गुरुवारी सकाळी नायब तहसीलदार बी.यु. वाघे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी केमवाडीस भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर तलाठी चंद्रकांत कसाब, टी. के. रुपनवार, ए. जी. भातभागे, बी.ए. माचने यांनी केमवाडीतील पंचनामे करण्यासाठी पाचाराण करण्यात आले होते. हे काम युद्ध पातळीवर सुरु होते. मात्र गावकर्यांची भिती स्पष्टपणे जाणवत होती. निवार्याअभावी बेघर झालेल्या कुटुंबांना आसरा द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) वादळी तडाख्याने पाच गावांना फटका फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी पावसाचा फटका आजवर पिंपळा (खुर्द), वडगाव (काटी), आरळी (बु), भातंब्री, जळकोटवाडी, केमवाडी, गवळेवाडी गावाला बसला आहे. या पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत. या नैसर्गिक संकटातून सावरताना शेतकरी, बेघर कुटुंबांना कसरत करावी लागत आहे.