उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:19+5:302021-03-04T05:00:19+5:30
तेरखेडा : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा येथे आयआरबी कंपनीद्वारे मोठा उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. मात्र, येथील सर्व दिवे बंद ...

उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य
तेरखेडा : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा येथे आयआरबी कंपनीद्वारे मोठा उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. मात्र, येथील सर्व दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. फटाका उद्योग, बॅंक व्यवहार, बाजारपेठेमुळे तेरखेडा येथे परिसरातील पाच गावातील ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या उड्डाणपुलाखाली एक मोठा तर दोन लहान भुयारी मार्ग वाहनांना व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. उड्डाणपुलावर बाजूच्या दोन्ही बाजूंच्या रोडवरती रात्रीच्यावेळी प्रकाश पढावा म्हणून लाखो रुपये खर्च करुन टाॅवर, लॅम्प बसवून विद्युतीकरण करण्यात आले आहे. परंतु या उड्डाणपुलावरील बसविण्यात आलेल्या सर्व टाॅवर लॅम्प दहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावर व बाजुच्या दोन्ही रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत असून, यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांकडून येडशी व पारगाव टोल नाक्यावर कर वसूल केला जातो. परंतु, सुविधा मात्र मिळत नसल्याा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे.
कोट.......
तेरखेडा येथील उड्डाणपुलावर बसविण्यात आलेल्या टाॅवर लॅम्प विद्युतीकरणाचे २६ लाख रुपयांचे वीजबील आयआरबी कंपनीकडे थकीत आहे. कंपनीने वीज बिलाचा भरणा न केल्याने वीज वितरण कंपनीने उड्डाणपुलावरील वीजपुरवठा खंडित केला आहे. आयआरबी कंपनीने वीजबील भरणा केल्यानंतर वीजजोडणी करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
रमेश शेंद्रे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण