शेतकऱ्याने धरली चाड्यावर मूठ...
By Admin | Updated: July 10, 2014 00:59 IST2014-07-10T00:28:32+5:302014-07-10T00:59:28+5:30
उस्मानाबाद : महिनाभराच्या खंडानंतर जिल्ह्यात मागील तीन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्याने धरली चाड्यावर मूठ...
उस्मानाबाद : महिनाभराच्या खंडानंतर जिल्ह्यात मागील तीन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बहुतांश तालुक्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरते झाले आहेत. खरीप पेरणीसाठी साडेचार लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असले तरी मूग आणि उडीद पेरणीचा कालावधी निघून गेल्याने सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. सोयाबीन सोबतच मका, सूर्यफुल हेही क्षेत्र वाढू शकते.
अख्खा जून महिना सरल्यानंतर जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. मंगळवारी रात्री जवळपास २६.६१ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक ८३.३० मि.मी. पावसाची नोंद वाशी तालुक्यात झाली आहे. आजवर जिल्ह्यात सरासरीच्या एकूण १०४.८ मि.मी. पाऊस पडला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांनीही चाढ्यावर मुठ धरली आहे. १५ जून ते ७ जुलै या कालावधीत खरिपाची सर्व प्रकारची पिके घेतात येतात. परंतु उपरोक्त वेळेमध्ये जिल्ह््यात पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे मूग आणि उडदाची पेरणी करता येत नाही. तसे कृषी विद्यापीठाकडूनही सांगण्यात येते. त्यामुळे उडीद आणि पिकाचा पेरा घटणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. १५ हजार ६०० हेक्टरवर मुगाची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज होता. तर ३९ हजार ६०० हेक्टर क्षेत्र उडदाच्या पिकाखाली येईल असे प्रस्तावित केले होते.
प्रत्यक्षात या पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेला आहे. असे असले तरी ८ ते १० हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची पेरणी होऊ शकते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रस्तावित क्षेत्र आता सूर्यफूल, सोयाबीन आणि मका या पिकांखाली येऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी एम. एस. मिनियार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
खरिपासाठी प्रस्तावित क्षेत्र
पिके क्षेत्र
तूर ७५३००
मूग १५८००
उडीद ३९६००
सूर्यफूल ८४००
सोयाबीन १४६९००
कापूस ३३१००
तीळ ३२००
भुईमूग १४००
मका २८५००
बाजरी १२६००
ख. ज्वारी ३३९००
वाशी तालुक्यात सर्वाधिक नोंद
आजवर जिल्ह््यामध्ये सरासरीच्या एकूण १०४.८ मि.मी. पाऊस पडला आहे. सहा तालुक्यांनी शंभरी ओलांडली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात १०८, उमरगा १०६.२, लोहारा १०१, भूम १०७.०४, कळंब १०३.४ तर वाशी तालुक्यामध्ये सर्वाधिक १४५.३ मि.मी. इतका एकूण पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी भूम तालुक्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली होती.
जळकोट सर्कलवर अवकृपाच
तुळजापूर तालुक्यातील जळकोट सर्कलमध्ये सर्वात कमी ३९.२ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. त्यानंतर सावरगाव सर्कलमध्ये ४४ मि.मी., परंडा सर्कलमध्ये ४८ मि.मी., नळदुर्ग सर्कलमध्ये ५५ मि.मी. तर वालवड सर्कलमध्ये ५७ मि.मी. इतका अत्यल्प पाऊस झाला आहे. अन्य सर्कलमध्ये मात्र ६० मि.मी. च्या वर पाऊस पडला आहे. त्यामुळे उपरोक्त सर्कलमधील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
घरगुती बियाणांवर भर
सोयाबीन बियाणाचे वाढलेले दर आणि मागणी लक्षात घेता, बियाणाची टंचाई निर्माण होणार हे दिसून येत होते. त्यावर कृषी विभागाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनही केले. त्यामुळे आजघडीला ५० टक्के शेतकरी घरगुती बियाणांचा वापर करीत आहेत. याचाच परिणाम बियाणे विक्रेत्यांवर झाला आहे. सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण होईल म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली. मात्र आता शेतकऱ्यांकडून फारशी मागणी होत नसल्याचे विक्रेते सांगतात.