उस्मानाबाद/ईट : मागील २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर भूम तालुक्यातील तीन, तर वाशी तालुक्यातील एका मंडळामध्ये साेमवारी रात्री अतिवृष्टी झाली. हा पाऊस खरीप हंगामातील साेयाबीनसारख्या नगदी पिकांसाठी लाभदायी असला तरी वादळी वाऱ्यामुळे ऊस, मक्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्हाभरात मागील वीस ते पंचवीस दिवस पावसाने खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, आदी पिके वाया गेली, तर साेयाबीनही करपण्याच्या मार्गावर हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या हाेत्या. असे असतानाच साेमवारी रात्री भूम तालुक्यात वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस झाला. भूमसह तीन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नाेंद झाली आहे. यामध्ये भूम मंडळात सर्वाधिक १३५.८ मिलिमीटर पाऊस नाेंदविला गेला. साेबतच ईट मंडळातही ८० मिलिमीटर, आंबी मंडळात ७१.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे. तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा मंडळात ७९.८ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे ईटसह परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी लाभदायी मानला जात आहे. मात्र, दुसरीकडे ऊस तसेच मका ही दाेन्ही पिके आडवी झाली आहेत. या पावसामुळे भूजलस्तर उंचावण्यास मदत हाेईल, असे शेतकरी सांगताहेत.
चाैकट...
संरक्षक कठडा ढासळला...
ईटसह पाथरूड परिसरातही जाेरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाथरूड जवळील घाटातील रस्त्यालगत असलेला संरक्षक कठडा ढासळला. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. ही बाब लक्षात घेता, तातडीने कठडा बांधण्याची गरज आहे.
दहा तास वीज खंडित...
वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात हाेताच विद्युत पुरवठा खंडित झाला. महावितरणकडून तांत्रिक बिघाड दूर न झाल्याने जवळपास दहा तास वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागला.
दृष्टिक्षेपात पाऊस
तालुका मिमी
उस्मानाबाद २.१
तुळजापूर ८.१
परंडा १४.६
भूम ७१.७
कळंब ८.४
उमरगा ४.४
लाेहारा ६.०
वाशी ५९.१
एकूण १८.४