महामारीतही लाचखोरी, अवैध ‘महसूल’ सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:24+5:302021-06-03T04:23:24+5:30

उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले त्याचा कसलाही परिणाम लाचखाेरांवर झालेला दिसत नाही. अगदी लॉकडाऊन काळातही लाचखोरी ...

Even in epidemics, bribery, illegal ‘revenue’ is trapped | महामारीतही लाचखोरी, अवैध ‘महसूल’ सापळ्यात

महामारीतही लाचखोरी, अवैध ‘महसूल’ सापळ्यात

उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले त्याचा कसलाही परिणाम लाचखाेरांवर झालेला दिसत नाही. अगदी लॉकडाऊन काळातही लाचखोरी जोमातच सुरू आहे. चालू वर्षाच्या अवघ्या ५ महिन्यांतच तब्बल १४ कारवाया झाल्या आहेत. यात महसूल, पंचायत व शिक्षण विभाग अग्रेसर आहेत.

दणक्यात कारवाया होत असतानाही लाचखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. गतवर्षीचे दीर्घ लॉकडाऊन व त्यामुळे खोळंबून पडलेली कामे तसेच इतरही कामे करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना सरकारी अधिकारी-कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. चालू वर्षात शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या दोन मुख्याध्यापकांवर लाच घेताना कारवाई झाली आहे. यापाठोपाठ महावितरणमधील सहायक अभियंत्यासह इतरांवरही ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी ५५ हजारांची लाच घेताना कारवाई झाली. महसूल विभागात एक कोतवाल व नायब तहसीलदारही लाच घेताना दोन वेगवेगळ्या प्रकरणात अडकले. यासोबतच कृषी विभागातील कृषी सहायक, आरटीओ एजंट, दोन पोलीस, नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जाळ्यात अडकले, तर पंचायत विभागातील ग्रामसेविका व अन्य प्रकरणात सरपंच लाच घेताना लाचलुचपत विभागाने सापळ्यात अडकविले.

कोणत्या वर्षात किती कारवाया...

२०१८ : ३१

२०१९ : २५

२०२० : १४

कोरोनाकाळातही सरकारी वरकमाईची धूम...

महावितरण : ३

महसूल : ५

पोलीस : ५

नोंदणी विभाग : २

आरटीओ : २

कृषी : १

लघुपाटबंधारे : १

शिक्षण : २

पंचायत विभाग : ४

प्रकरणे उघडी करण्यात शेतकरी पुढे...

लाचखोरीचे सर्वाधिक शिकार हे शेतकरीच ठरत आहेत. शिवाय, लाचखोरांना एक्सपोझ करण्यातही शेतकरीच पुढे आहेत. यावर्षीच्या १४ पैकी ५ प्रकरणे शेतकऱ्यांनीच उघडकीस आणली आहेत. ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी, फेरफार नक्कल देण्यासाठी, तुषार सिंचन अनुदान, शेती मशागतीस रोजगार मागणी, सिंचन विहिरीचे अनुदान देण्यासाठी लाच मागणाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाळ्यात अडकविले आहे.

कोट...

गतवर्षी पहिलाच लॉकडाऊन व तोही कडक असल्याने लाचखोरी काहीअंशी थांबली होती. आता मात्र, पुन्हा ती जोमात सुरू झाली आहे. नागरिकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे मानधन, अनुदान घेणाऱ्या व्यक्ती, शासकीय काम करून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या व्यक्तींची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी. ०२४७२-२२२८७९ या कार्यालयीन क्रमांकावर किंवा अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक फोनवरूनही आपली तक्रार नोंदवावी.

- प्रशांत संपते, उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: Even in epidemics, bribery, illegal ‘revenue’ is trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.