नाद करायचा नाय, इथे आपलीच चालते !; माजी खासदारांनी ताणले नामदारांवर धनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 10:38 IST2019-07-23T09:03:00+5:302019-07-23T10:38:23+5:30
‘नाद करायचा नाय़़’ असा डॉयलॉग हाणत माजी खासदार गायकवाड यांनी सेनेतील नामदारांवर धनुष्यबाण ताणले आहे़

नाद करायचा नाय, इथे आपलीच चालते !; माजी खासदारांनी ताणले नामदारांवर धनुष्य
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन शिवसेना नेत्यात पडलेला विस्तव विझला, असे वाटत असतानाच माजी खासदारांनी या निखाऱ्यावर जमलेली राख उडवून लावली़ ‘नाद करायचा नाय़़’ असा डॉयलॉग हाणत माजी खासदार गायकवाड यांनी सेनेतील नामदारांवर धनुष्यबाण ताणले आहे़
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मोहरा बदलून ओम राजेनिंबाळकर हा युवा चेहरा समोर आणला़ तत्कालीन खासदार प्रा़ रवी गायकवाड हे जनतेच्या संपर्कात नसल्याचा दावा करीत त्यांना स्वपक्षातूनच मोठा विरोध झाला़ ‘इलेक्टीव्ह मेरिट’चे सूत्र वापरुन जलसंधारणमंत्री प्रा़ तानाजी सावंत यांनीही ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी मातोश्रीवर आग्रह धरला, हे लपून राहिलेले नाही़ नामदार सावंत हे गायकवाड यांच्यासाठी ‘खलनायक’ ठरले़ नेमके हेच शल्य प्रा़ रवी गायकवाड यांना अजूनही बोचत आहे़ निवडणूक प्रचारकाळात खुद्द उद्धव ठाकरे यांनी गायकवाड व त्यांच्या पुत्रांचे पुनर्वसन करु, असा शब्द दिल्यानंतरही त्यांनी पक्षाचे काम केले नाही़ याही पुढे जावून त्यांनी विरोधाचीच भूमिका घेतल्याचे दिसून आले़ मात्र, परिणाम फारसा झाला नाही़ निवडणुका झाल्या, निकाल लागला़ उमरगा विधानसभा मतदारसंघातून विरोधानंतरही शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले़
यानंतरच्या काळात माजी खा़ रवी गायकवाड हे शांत बसले होते़ दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘मातोश्री’वर गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ‘आशिर्वाद’ मिळविले़ कदाचित या आशिर्वादातून मिळालेल्या अवसानावर त्यांनी काहिश्या शांत झालेल्या निखाºयावरील राख उडवून तो धगधगता ठेवला़ उमरग्यात परवा आयोजित एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ‘नाद करायचा नाय़़़ काय करायचं ते रवी गायकवाडच ठरवेल या तालुक्यात़़़’, अशी डॉयलॉगबाजी करीत त्यांनी पुन्हा धनुष्य ताणले़ त्यांच्या बाणाचा रोख सावंत यांच्यासोबतच खासदार राजेनिंबाळकरांच्याही दिशेने होता़ आता या बाणात किती त्राण आहे? याचे उत्तर येणाºया विधानसभा निवडणुकीतूनच मिळू शकेल़