धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड; प्रतिगट १७ अर्ज
By चेतनकुमार धनुरे | Updated: January 24, 2026 15:39 IST2026-01-24T15:38:36+5:302026-01-24T15:39:19+5:30
वैध उमेदवारांची संख्या पाहून लढण्याची इच्छा किती अनावर झालीय, याची प्रचिती येते.

धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड; प्रतिगट १७ अर्ज
- चेतन धनुरे
धाराशिव : तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लागल्याने इच्छुकांची प्रचंड झुंबड उडाली आहे. पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढायचीच, या ईर्ष्येने अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी झालेल्या छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या पाहून लढण्याची इच्छा किती अनावर झालीय, याची प्रचिती येते.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १६५ जागांसाठी वैध ठरलेल्या अर्जांची संख्या पाहता प्रतिजागा सरासरी १५ उमेदवार राहिले आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या जागांसाठी एकूण ९६७ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ९३८ अर्ज वैध ठरले असून, दोन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. अर्जांची ही संख्या लक्षात घेता एका जागेसाठी सरासरी १७ अर्ज वैध ठरले आहेत. इच्छुकांची ही संख्या अभूतपूर्व ठरावी, अशीच आहे. दुसरीकडे पंचायत समित्यांसाठीही अशीच गर्दी आहे. एकूण ११० जागांसाठी जिल्हाभरातून १,३६० जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील १,३२१ अर्ज वैध ठरले आहेत. ३८ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, एका अर्जांवर सुनावणी सुरू आहे. या वैध अर्जांची संख्या विचारात घेता एका जागेसाठी सरासरी १२ इच्छुक मैदानात उरले आहेत. आता २७ तारखेपर्यंत त्यांना अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर किती उमेदवार रिंगणात राहतात, हे कळू शकेल.
पंचायत समिती नको, थेट झेडपीच हवी
पंचायत समित्यांपेक्षा थेट जिल्हा परिषदेतच प्रमोशन मिळवू इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी सरासरी १७ उमेदवार राहिले आहेत. पंचायत समित्यांच्या एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार आहेत. यावरून जिल्हा परिषदेचीच महत्त्वाकांक्षा ठेवून निवडणूक लढवू इच्छिणारे असल्याचे स्पष्ट होते.
तालुका गट संख्या वैध अर्ज सरासरी अर्ज
धाराशिव १२ २४९ २१
तुळजापूर १० १३९ १४
भूम ०५ ८७ १७
परंडा ०५ ९२ १८
उमरगा ०९ ११७ १३
वाशी ०३ ४५ १५
लोहारा ०४ ५१ १३
कळंब ०८ १५८ २०
एकूण ५५ ९३८ १७
सर्वाधिक इच्छुक, धाराशिव, कळंबमध्ये
जिल्हा परिषदेच्या बाबतीत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही धाराशिव व कळंब तालुक्यात आहे. येथील प्रति एका जागेसाठी अनुक्रमे २१ व २० उमेदवार राहिले आहेत, तर पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची सर्वाधिक सरासरी संख्या परंडा तालुक्यात प्रतिजागा १५ इतकी आहे.