मृतदेह एकाचा, दिला दुसऱ्यांना; नंतर म्हणाले तो नव्हे, हा तुमचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:39+5:302021-05-07T04:34:39+5:30
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील मृत्यूंच्या घोळात गुरुवारी आणखी एक अजब-गजब प्रकरण बाहेर आले. मृत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून ...

मृतदेह एकाचा, दिला दुसऱ्यांना; नंतर म्हणाले तो नव्हे, हा तुमचा !
उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील मृत्यूंच्या घोळात गुरुवारी आणखी एक अजब-गजब प्रकरण बाहेर आले. मृत वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून बुधवारी (दि. ५) मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला होता. त्यांनी त्याच दिवशी अंत्यविधीही केला. मात्र, गुरुवारी पुन्हा याच महिलेवर पालिका अंत्यसंस्कार करणार आहे. आपण या, असा फोन नातेवाइकांना गेला. यामुळे जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील एका वृद्ध महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी (दि. ४) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच दिवशी रात्री या महिलेचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगण्यात आले. दरम्यान, पुढच्या प्रक्रियांमुळे लागलीच मृतदेह देण्यात आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाइकांना या महिलेचा मृतदेह कोविड संशयित असल्याने पॅक करून देण्यात आला. त्यामुळे नातेवाइकांनी चेहरा न पाहताच तो गावी नेऊन अंत्यविधी उरकून घेतला. गुरुवारी राख सावरण्याचा विधी करून सगळे घरी परतल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून या नातेवाइकांना फोन गेला. तुमच्या परिवारातील मृत महिलेवर उस्मानाबाद येथे पालिकेकडून अंत्यसंस्कार होणार आहेत. आपण उपस्थित राहावे, असे सांगितल्यावर नातेवाइकांचे होशच उडाले. त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तो आपल्याच कुटुंबातील महिलेचा असल्याचे लक्षात आले. यावरून नातेवाईक चांगलेच संतप्त झाले होते. त्यांच्याकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
तो मृतदेह कोणाचा?
बुधवारी (दि. ५) जिल्हा रुग्णालयातून जो मृतदेह वाघोली येथील महिलेचा समजून पॅक करून देण्यात आला होता, त्यावर विधीवत अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. मात्र, बुधवारी कळविण्यात आलेला मृतदेह खरा निघाल्याने पहिला मृतदेह कोणाचा होता, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही.
डी.के. आप गजहब है...
या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी निर्धास्तपणे उत्तरे दिली. केवळ स्टिकरमध्ये बदल झाल्याने हा सगळा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, हा विषय चर्चेअंती संपुष्टात आल्याचेही ते म्हणाले. यावरून किती शिस्तीत या जिल्हा रुग्णालयाचा कारभार चाललाय, हेच अधोरेखित होत आहे.