कोरोनाने नाती तुटली, आजीच्या अंतिम प्रवासाला माणुसकीच धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST2021-05-14T04:31:53+5:302021-05-14T04:31:53+5:30

चेतन धनुरे / उस्मानाबाद : कोरोनाने माणूस माणसात ठेवला नाही. नाती, शेजारधर्माची कुंडले केव्हाचीच गळून पडलीत. आता उरलीय ती ...

Corona broke off the relationship, running to Grandma's last journey in a humane way | कोरोनाने नाती तुटली, आजीच्या अंतिम प्रवासाला माणुसकीच धावली

कोरोनाने नाती तुटली, आजीच्या अंतिम प्रवासाला माणुसकीच धावली

चेतन धनुरे / उस्मानाबाद : कोरोनाने माणूस माणसात ठेवला नाही. नाती, शेजारधर्माची कुंडले केव्हाचीच गळून पडलीत. आता उरलीय ती केवळ माणुसकी. याच माणुसकीचा प्रत्यय भूमच्या महिला तहसीलदार अन बिडीओंनी आणून दिला. देवळाली येथील एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला कोणीच पुढे येत नव्हते तेव्हा या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री स्वतः मातीत उतरून तिचा अंतिम प्रवास सुकर केला.

देवळाली येथील एका कुटुंबातील तिघे कोरोना बाधित निघाले. घरातील दोन कर्ते पुरुष अन् ७५ वर्षीय आजीबाईंना त्रास सुरू झाला. तेव्हा भूमला तपासणी करून बार्शी येथे उपचार घेऊ असे सांगत त्यांनी भूम सोडले. आजीबाईंनी मात्र, घरीच राहण्याचा हट्ट धरला. तेव्हा ते दोघे बार्शीच्या रुग्णालयात दाखल झाले. इकडे आजींनी आजार अंगावर काढत बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. घरात एक महिला अन् दोन लहान मुले होती. कर्ती माणसे दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना. हा प्रकार रात्री १० वाजता तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या कानी पडला. दीड तास प्रयत्न करूनही प्रश्न सुटत नव्हता. तेव्हा त्या स्वतः, बीडीओ भागवत धवलशंख यांनी ग्रामसेवक व अन्य एका सहकाऱ्यासोबत घेऊन देवळाली गाठली. अंगावर पीपीई किट परिधान करून हे चौघेही मृतदेह घेऊन मध्यरात्री १२ वाजता स्मशानात गेले अन् त्यांनीच या आजींचा अंत्यविधी ही केला. एकीकडे या आजारामुळे सगळीच नाती मृतप्राय होत असताना माणुसकी अजूनही जिवंत आहे, हेच या घटनेतून प्रकर्षाने समोर आले.

हे तर आमचे कर्तव्य...

मयत आजींच्या घरात ही कोणी पुरुष कर्ती माणसे नव्हती. ही घटना कळल्यानंतर अंत्यविधी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा फोन लागत नसल्याने रात्रीच बीडीओ धवलशंख यांच्या सोबतीने त्यांचे घर गाठले. तेव्हा तिथेही कुटुंबात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपणच अंत्यविधी करायचा असे ठरवून आम्ही देवळाली गाठली. मध्यरात्री अंत्यसंस्कार केले. माणुसकीच्या नात्याने आम्ही हे आमचे कर्तव्यच समजून ते पार पाडले.

-उषाकिरण शृंगारे, तहसीलदार, भूम (जि. उस्मानाबाद)

Web Title: Corona broke off the relationship, running to Grandma's last journey in a humane way