रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, चार दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST2021-04-04T04:33:55+5:302021-04-04T04:33:55+5:30
उस्मानाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या नागरिकांना दोन महिने लस घेता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण ...

रक्तपेढ्या ऑक्सिजनवर, चार दिवस पुरेल एवढाच साठा
उस्मानाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या नागरिकांना दोन महिने लस घेता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत चार दिवस पुरेल इतका, तर दोन खासगी रक्तपेढ्यांतही आठ दिवस पुरतील इतक्याच रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. येत्या काळात निर्माण होणारी रक्तटंचाई टाळण्याकरिता रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यातून केले जात आहे.
जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक रक्तपेढी व दोन खासगी रक्तपेढी कार्यान्वित आहे. या रक्तपेढीचा आधार दुर्धर आजाराने ग्रस्त, गरोदर माता, अपघातातील व्यक्ती, थलेसिमिया आजाराच्या रुग्णांना मिळत असतो. मात्र, मागील अडीच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या घटली आहे. सध्या शासकीय रक्तपेढीत ४ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे, तर दोन खासगी रक्तपेढीत ८ दिवस पुरतील इतक्या रक्तपिशव्या आहेत. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता लस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासकीय रक्तपेढीत दोन दिवसांचा साठा
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीची ५०० रक्तपिशव्या संकलित करण्याची क्षमता आहे. गतवर्षी कोरोनाचा लॉकडाऊन लागू झाल्याने रक्तदात्यांची संख्या घटू लागली होती. दिवाळीनंतर रक्तदाते पुढे येत. मात्र, लस घेतल्यानंतर रक्तदात्यांना दोन महिने लस घेता येत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. रक्तपेढीत ४४ बॅग उपलब्ध असून, या केवळ ४ दिवस पुरतील इतक्या असल्याची माहिती रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अश्विनी गोरे यांनी दिली.
शासकीय रक्तपेढी उस्मानाबाद
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत. परिणामी, रक्ताचा तुडवडा निर्माण होत आहे. या रक्तपेढीतून प्रतिदिन १० ते १५ बॅग रक्ताची मागणी असते. मात्र, त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी आहे.
सह्याद्री रक्तपेढी उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील सह्याद्री रक्तपेढीची क्षमता १ हजार बॅगची आहे. या रक्तपेढीत दिवसाकाठी ४ ते ५ रक्तपिशव्यांची मागणी असते. सध्या २५ बॅग उपलब्ध असून, त्या चार ते पाच दिवस पुरेल एवढाच साठा आहे.
श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगा
उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीचा उमरगा शहर तसेच परिसरातील नागरिकांना आधार आहे. या पेढीतून दिवसाला ७ ते ८ बॅगला मागणी असते. या ठिकाणी ७० पिशव्या उपलब्ध असून, ७ ते ८ दिवस पुरेल एवढा साठा आहे.
लसीकरणअभावी करा रक्तदान
लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरण करण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, तसेच सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी रक्तदान शिबिरे घेण्याचा पुढाकार घ्यावा. शिवाय, सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू नसल्याने या वयोगटातील रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.
डॉ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक.