भाटशिरपुऱ्यातील बाधित कुटुंबाने शेतात हलविला मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST2021-04-29T04:24:21+5:302021-04-29T04:24:21+5:30
कळंब : कोरोनाचा आकडा चिंता वाढवत असताना अनेकजण बेफिकिरीने वावरत आहेत. एकूणच ‘कळतंय पण, वळत नाही’ अशी अवस्था असणाऱ्यांची ...

भाटशिरपुऱ्यातील बाधित कुटुंबाने शेतात हलविला मुक्काम
कळंब : कोरोनाचा आकडा चिंता वाढवत असताना अनेकजण बेफिकिरीने वावरत आहेत. एकूणच ‘कळतंय पण, वळत नाही’ अशी अवस्था असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे भाटशिरपुरा येथील एका बाधित कुटुंबाने मात्र लोकांना आपला ‘ताप’ नको म्हणत थेट शेतात राहुटी ठोकत ‘आयसोलेट’ करून घेतले आहे.
‘आपल्याला बऱ्यापैकी कळतंय' असा समज असलेली उच्चशिक्षित मंडळीही कोरोना प्रादुर्भाव काळात बेफिकीर वागत आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क, टेस्टिंग, ट्रेसिंग याबाबतीत तर सजगपणा दिसून येतच नाही, शिवाय स्वॅब दिल्यानंतर त्याचा निकाल येण्याआधी बाहेर हुंदडणाऱ्यांची, बाधितांचा सहवास असताना समाजात मिसळणारी माणसे दिसून येत आहेत.
सुन्न करणाऱ्या वातावरणात असे बेफिकीर राहणाऱ्यांचा वावर दिसून येत असला तरी काही डोळस, समाजभान असलेली माणसंही समोर येतात. आपणासारखे इतरावर संकट कोसळू नये, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, अशी काळजी घेणाऱ्या या मंडळीची संख्या मात्र तशी तोकडीच.
तालुक्यातील भाटशिरपुरा येथील एका साठी पार केलेल्या सदगृहस्थांचे कुटुंब यापैकीच एक आजी, आजोबा, मुलगा, सून व दोन नातवंडे असे सहा व्यक्तींचे त्यांचे कुटुंब. चार दिवसांपूर्वी या कुटुंबाला कोरोनाचा स्पर्श झाला अन् चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
दोनेक हजार लोकसंख्या व साडेतीनशे उंबरठा असलेल्या भाटशिरपुरा गावातील मुख्य चौकात त्यांचे घर. वर्दळीच्या भागात असलेल्या आपल्या घरात त्यांनी ‘होम आयसोलेट’ व्हायचं ठरवलं होतं. मात्र, आपल्यामुळे लोकांना त्रास नको म्हणून या कुटुंबाने स्वतःच्या शेतात राहून उपचार घ्यायचे ठरवले.
शेतात पक्का निवारा नसल्याने ज्वारीचा कडबा वापरत पारंपरिक पद्धतीची ‘कोप’ उभारण्यात आली. या निवाऱ्यातच ६० वर्षांचे आजोबा, ५५ वर्षांच्या आजी, ४० वर्षांचा मुलगा, सून व दोन नातवंडे सध्या ‘आयसोलेट’ होत डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत.
चौकट...
केवळ इतरांना त्रास होऊ नये यासाठी...
भाटशिरपुरा येथील ‘फार्म आयसोलेशन’ झालेल्या कुटुंबाने उस्मानाबाद येथे जाऊन आपल्या आवश्यक त्या तपासण्या केल्या आहेत. सध्या ते शेतात उपचार घेत आहेत. केवळ इतरांना आपल्यापासून त्रास होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे व त्यांच्या मित्रांनी स्वतः या राहुटीवर पोहोचत सर्वांची ऑक्सिजन पातळी तपासली आहे.