मेघालयमधील सोहरा येथे झालेल्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा अजूनही सत्य लपवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात नार्को चाचणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
पोलिसांचा स्पष्ट नकारपूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सिम यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी सध्या तपासात सहकार्य करत असून, त्यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे नार्को चाचणीची गरज भासणार नाही. शिवाय, भारतात नार्को चाचणीची वैधता न्यायालयीन प्रक्रियेत स्वीकारली जात नाही."
कुटुंबीयांची नार्को टेस्टची मागणीराजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपींकडून संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली आहे. राजाचा भाऊ सचिन रघुवंशी म्हणाला की, "आम्हाला खात्री आहे की सोनम आणि इतर आरोपी अजूनही अनेक गोष्टी लपवत आहेत. आम्हाला असेही वाटते की या हत्येमध्ये इतर लोकांचाही सहभाग असू शकतो."
हत्या आणि अटकसोनमवर तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा आणि आणखी तीन भाडोत्री गुन्हेगारांच्या मदतीने आपल्या नवविवाहित पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. हे कृत्य हनीमूनदरम्यान २३ मे रोजी मेघालयातील सोहरा भागात घडले. नंतर २ जून रोजी वेसाडोंग फॉल्सजवळ एका खोल खड्ड्यात राजाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेल्या होत्या आणि घटनास्थळाजवळून रक्ताने माखलेले शस्त्रही सापडले.
अटक व चौकशीमेघालय पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने सोनमसह राज सिंह कुशवाहा, आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या शिलाँगमध्ये पोलीस कोठडीत असून, त्यांची चौकशी सुरू आहे. शिलाँग न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजा आणि सोनम यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये पार पडला होता. अवघ्या काही दिवसांतच म्हणजे २० मे रोजी दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले. त्यानंतर २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले आणि नंतर घडलेल्या घटनांनी सर्वांना हादरवून सोडले.