‘सप्तपदी’नंतर आयुष्यभराचा जोडीदार सोबत घेऊन निघालेल्या एका वराला असा काही अनुभव आला, की त्याच्या पैशांसोबत वधूही फुर्र झाली. ही घटना बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील चैनपूर येथील असून, एक नवरदेव ‘लुटेरी दुल्हन’ टोळीच्या जाळ्यात कसा अडकला, याचे हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
गुरुवारी दुपारी, नवविवाहित वधू घेऊन निघालेला हरियाणातील प्रीथला गावचा रहिवासी पवन कुमार याच्या गाडीला राष्ट्रीय महामार्ग-२१९ वरील गेहुआनवा नदीजवळ काही दरोडेखोरांनी अडवले. त्यांनी केवळ वराकडील दागिने आणि रोख रक्कम लुटली नाही, तर वधूलाही दुचाकीवरून सोबत घेऊन पळ काढला.
फसवणुकीचा कट कसा रचला गेला?या घटनेनंतर जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पवन कुमारला मोठा धक्का बसला. त्याने चौकशी केली असता, त्याला कळले की तो एका ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा बळी ठरला आहे. या टोळीने मुलीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पवनाकडून आधीच १.१० लाख रुपये उकळले होते. वराचा भाऊ सुरेश याने तात्काळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
सुरेशने दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी चैनपूर पोलीस स्टेशन परिसरातील खारीगव्हाण येथे हे लग्न ठरले होते. फोनवरून एका मुलीसोबत हे लग्न जुळवण्यात आले होते. लग्नासाठी वधूचे कपडे, मेकअपचे साहित्य, मिठाई आणि दागिने हरियाणातून खास आणण्यात आले होते.
लग्नानंतर तासाभरातच घातलग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी, मुलीच्या कुटुंबीयांनी १.१० लाख रुपये घेतले. त्यानंतर वराच्या बाजूने दागिने आणि इतर वस्तू वधूला भेट म्हणून दिल्या गेल्या. यानंतर अवघ्या एका तासात लग्न आटोपले. मुलीच्या बाजूने एका ऑटोची व्यवस्था करण्यात आली आणि नवदाम्पत्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनकडे पाठवले गेले. मात्र, तीन किलोमीटरचे अंतर पार करताच दरोडेखोरांनी त्यांना लुटले आणि वधूला घेऊन पळ काढला.
या घटनेने ‘लुटेरी दुल्हन’ टोळ्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. लग्नाच्या पवित्र बंधनाआड चालणाऱ्या या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.