उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली. फोनवर बोलण्याच्या वादातून एका महिलेने पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे शिर धडावेगळे केले आणि धड आणि शिर दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी मृताची आई, मामासह कुटुंबातील इतर सदस्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, आस्था उर्फ तनिष्का असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून ती इयत्ता बारावीत शिकत होती. घटनेच्या दिवशी आस्था फोनवर तिच्या मित्राशी बोलत होती. हे पाहिल्यानंतर आस्थाची आई संतापली. त्यानंतर आस्थाच्या आईने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात आस्थाच्या आईने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आस्थाच्या मामाने तिचे शिर धडावेगळे केले आणि धड आणि शिर दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
निर्जनस्थळी मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना आस्थाच्या खिश्यात एक मोबाईल नंबर साडपला. पोलिसांनी ताबडतोब त्या नंबरवर फोन करून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आस्थाच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी आस्थाच्या आईने त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचे नाटक केले. परंतु, पोलिसांना आस्थाच्या आईचे बोलणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने मुलीच्या हत्येची कबूली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आस्थाची हत्या केल्यानंतर तिच्या आईने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आस्थाच्या मामाने मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केले आणि नातेवाईकांच्या मदतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आस्थाचे धड बहादूरपूर येथील एका कालवण्यात आणि शिर जवळच्या एका नाल्यात फेकण्यात आले. याप्रकरणी आस्थाची आई, मामा आणि इतर नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.