उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे प्रेमसंबंधातून एका तरुण-तरुणीने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकांनी त्यांना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि रेल्वेसमोर उडी मारून आपला जीव दिला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडी येण्यापूर्वी दोघेही एकमेकांचा हात पकडून होते आणि ट्रेन जवळ येत असताना एकमेकांना मिठी मारून रडत होते. भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटने त्यांना बाजूला होण्याचा इशारा दिला आणि अनेकवेळा हॉर्नही वाजवला, मात्र ते रुळावरून बाजूला झाले नाहीत. ट्रेनखाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे झाले होते.
मृतक तरुण सुशांत आणि तरुणी आशी दोघेही बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैफपूर जगन गावाचे रहिवासी होते. सुशांत मुरादाबादमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत राहून एका फॅक्टरीत नोकरी करत होता आणि काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. तर, आशीने याच वर्षी १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास दोघेही घरात कोणालाही न सांगता मुरादाबाद-चंदौसी रेल्वे लाईनजवळ पोहोचले, जिथे त्यांनी एकत्र आत्महत्या केली.
कुटुंबीयांची चौकशी सुरूमुरादाबाद पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मृतांचे शरीर पाच तुकड्यांमध्ये आढळले असून, ते ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, प्रेमसंबंधातून घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.