वनविभागाची सिनेस्टाईल कारवाई; गुराखी, शेतकऱ्याचा पेहराव घेऊन आरोपीला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 23:49 IST2025-03-19T23:48:47+5:302025-03-19T23:49:39+5:30
दीड वर्षांपासून देत होते गुंगारा

वनविभागाची सिनेस्टाईल कारवाई; गुराखी, शेतकऱ्याचा पेहराव घेऊन आरोपीला ठोकल्या बेड्या
परिमल डोहणे
चंद्रपूर - वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत वनगुन्हा नोंद असलेल्या व मागील दीड वर्षांपासून वनविभागाला गुंगाऱ्या देणाऱ्या आरोपीला सावली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुराखी, शेतकरी असा पेहराव घेऊन मुडझा व बामणी येथून बुधवारी सिनेस्टाईल अटक केली. राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी (३०) रा. मुडझा ता. ब्रह्मपुरी, शत्रुघ्न वसंत महाडोळे (३२) रा. बल्लारपूर ता. ब्रह्मपुरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
ही कारवाई सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात पाथरीचे क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाटील, राजोलीचे क्षेत्र सहाय्यक सुरेंद्र सिंग वाकडोत, व्याहाडचे क्षेत्र सहाय्यक रवी सुर्यवंशी, वनरक्षक महादेव मुंडे, वनरक्षक खेमराज गोडशेलवार, वनरक्षक श्रीराम आदे, वनरक्षक एकनाथ खुडे, अतिन मानकर, घनश्याम बनसोड, किशोर काटपलीवार, नागेश बद्दमवार आदींनी केली. पुढील तपास विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करत आहेत.
अशी केली कारवाई
राजेंद्रसिंग व शत्रुघ्न हे दोघेही १३ ऑगस्ट २०२३ रोजी रानटी डुक्कर व ससा शिकार प्रकरणातील मुख्य आरोपी होते. ते तेव्हापासून वनविभागाला गुंगारा देत होते. त्याच्या अटकेसाठी सावली वनविभागाचे पथक पाळत ठेऊन होते. दरम्यान राजेंद्रसिंग मुडझा येथे तर शत्रुघ्न बामणी येथे येणार असल्याची टीप वनविभागाला मिळाली.
त्याआधारावर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात सापळा रचन्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांपैकी कुणी शेतकरी, कुणी गुराखी तर कुणी गावातील नागरिकांची वेशभुषा परिधान करुन मुडझा व बामणी येथे बस्थान मांडून होते. दरम्यान राजेंद्रसिंग जरनेलसिंग बावरी मुडझा येथे येताच त्याला अटक केली. व शत्रुघ्न वसंत महाडोळे बामणी येथे येताच अटक करण्यात आली.
पोलिसांतही होता गुन्हा शोध
राजेंद्रसिंग बावरी व शत्रुघ्न महाडोळे या दोघांवर अवैध दारुविक्री यासह विविध प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल होते, अशी मागणी वनविभागाने दिली. दरम्यान वन्यप्राणी शिकार प्रकरणात मागील दीड वर्षांपासून ते वनविभागाला गुंगारा देत होते. मात्र बुधवारी वनविभागाने बेड्या ठोकल्या.