इंदूरच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. राजा रघुवंशीच्या हत्येबाबत चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. चौकशीत आरोपींनी सोनमच्या समोरच राजावर वार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच हत्या केल्यावर राजाचा मृतदेह दरीत फेकल्याचे सांगितले आहे. सोनम रघुवंशीच मुख्य सुत्रधार असल्याचे या आरोपींनी चौकशीत कबुल केल्याचे क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी सांगितले आहे.
राजावर पहिला वार विशाल उर्फ विकी ठाकूरने केला होता. सोनम राजाला मारताना आणि मरताना पाहत होती. ती तिथेच होती, राजावर शस्त्राने वार करताना ती पाहत होती. यादरम्यान ती एकदाही थांबा किंवा घाबरून किंचाळली नाही, असे या आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले आहे. या हत्येवेळी राज कुशवाहा हा इंदूरमध्येच होता. त्यानेच आम्हाला खर्चाचे ४०-५० हजार रुपये दिले होते, असेही या तीन आरोपींनी कबुल केले आहे.
सोनम आणि तिचा पती शिलाँगला गेल्यावर लगेचच आम्ही देखील इंदूरहून निघालो. मेघालयला पोहोचण्यासाठी अनेक ट्रेन बदलाव्या लागल्या. आधी गुवाहाटीला गेलो, तेथून शिलाँगला गेल्याचे या आरोपींना पोलिसांना सांगितले. तसेच सोनम राजाची हत्या करून तिथून परत इंदूरला आली होती की नाही हे आता मेघालय पोलीसच सांगू शकतील असे एसीपी पूनम चंद यादव यांनी सांगितले. या संबंधी आमच्याकडे काही माहिती नाही, असेही त्या म्हणाल्या.
असा झालेला पहिला खुलासा...सोनमला अटक करण्याआधी कॉल डिटेल्सच्या आधारे ८ जून रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान शिलाँग पोलिसांनी राज कुशवाहाला अटक केली. सोनमला पकडल्यानंतर दोघांचंही गाझीपूरमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलं. सोनमला सांगण्यात आलं की, राज कुशवाह याने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे, आता तू सर्व सांगून टाक. यानंतर सोनमने संपूर्ण सत्य सांगितलं.