वडगाव मावळ - सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी जिल्हात सदस्यांचे अपहरण केल्याच्या घटना ताज्या असताना मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीआधी जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन जणांचे नाव लिहुन झाडाला लिंबू आणि खिळे ठोकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत विद्यमान सदस्य अविनाश मारूती असवले यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रायणी नदी जवळ भैरवनाथ मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाला अविनाश असवले, भुषन असवले व रूषीनाथ शिंदे यांच्या नावाने लिंबाला खिळे ठोकून झाडाला लावले होते. ही माहिती समजल्यावर शिवाजी असवले, व इतरजण पाहण्यासाठी गेले. शहानीशा केल्यांनंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.पोलिसांनी घटनास्थळी जाउन तिघांचे फलक काढून नदीत फेकून दिले.समाजात अंधश्रध्दा पसवणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.