इंदूर - राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह यांनी संपूर्ण प्लॅनिंग केल्याचे उघड झाले. राजाची हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती असं तपासात पुढे आले परंतु त्यानंतर हत्येत सहभागी ३ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून राज कुशवाहचे मित्र असल्याचे समोर आले.
मित्रांना हत्येसाठी कसं तयार केले?
माहितीनुसार, १६ मे रोजी राजने हत्येचे षडयंत्र रचलं आणि इंदूरच्या एका कॅफेमध्ये त्याच्या बालपणीच्या तीन मित्रांची भेट घेतली. त्याने मित्रांना हत्येसाठी पैशाचं आमिष दिले होते. राजने त्याच्या तिन्ही मित्रांना २० मे रोजी मेघालयला पाठवले जेव्हा सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हनीमूनसाठी रवाना झाले होते.
मित्रांनी केला मर्डर
या प्लॅनिंगवेळी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह मेघालयला जाण्याऐवजी इथेच इंदूरमध्ये थांबला. शिलांग पोलिसांच्या माहितीनुसार राजने पडद्यामागून हत्याकांड घडवून आणला. तो सातत्याने सोनमच्या संपर्कात होता. हत्येदिवशी सोनम तिच्या पतीला घेऊन एका निर्जनस्थळी घेऊन गेली. जिथे या ३ जणांनी राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि त्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकून दिला.
सर्व आरोपी अटकेत सध्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी, हत्येचा मास्टरमाईंड तिचा प्रियकर राज कुशवाह आणि हत्या घडवून आणणाऱ्या तिघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री उत्तर प्रदेशातील गाजीपूरला आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोर सरेंडर केले त्यानंतर इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. आनंद कुमार, आकाश राजपूत, विक्की उर्फ विशाल ठाकूर असं या आरोपींची नावे आहेत. हे सर्व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. आनंद कुमारला उत्तर प्रदेशच्या बिना जिल्हा, आकाश राजपूतला ललितपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली तर विक्की ठाकूरला इंदूरमध्ये अटक केली आहे.
लग्नाच्या १७ दिवसांनीच पतीला संपवले
सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी पार पडले होते. त्यानंतर दोघंही हनिमूनसाठी शिलाँगला गेले. मात्र २ जून रोजी, राजाचा मृतदेह एका दरीजवळील खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनमने मेघालय सोडून इंदूर गाठलं आणि तिथे भाड्याच्या घरात वास्तव्य केलं. काही काळाने ती गाजीपूरकडे रवाना झाली, जिथे तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.