तेलंगणातील आदिलाबादमध्ये गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. ३० मे रोजी बंगारीगुडा गावात ही घटना घडली. गोळ्या घेतल्यानंतर महिलेला खूप रक्तस्त्राव झाला. अशा परिस्थितीत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिला हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ३१ मे रोजी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला गर्भपातासाठी जबरदस्तीने गोळ्या दिल्या, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव आणि इतर समस्यांमुळे अधिक गुंतागुंत निर्माण झाली. तक्रारीच्या आधारे महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याआधीही जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील अंबिकापूर येथील एका महिलेने तिचा प्रियकर आणि नातेवाईकांवर गंभीर आरोप केले होते. महिलेने सांगितलं की, तिचा प्रियकर मनीष यादवने ती ८ महिन्यांची गर्भवती असताना जबरदस्तीने तिचा गर्भपात केला.
महिलेने एसपीकडे तक्रार केली की, मनीषने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती राहिल्यावर जुलैमध्ये मनीषच्या नातेवाईकांनी तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली होती.