Noida Cyber Fraud : उत्तर प्रदेशातील नोएडातून सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका निवृत्त विंग कमांडरच्या कुटुंबाला ३६ दिवस डिजिटल पद्धतीने अरेस्ट करण्यात आले अन् त्यांच्याकडून तब्बल ३.२२ कोटी रुपये लुबाडले. आरोपींनी या कुटुंबाला अटकेची भीती दाखवली, ज्यामुळे या कुटुंबाने आरोपींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पण, नंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबाने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर २५ मध्ये राहणारे निवृत्त विंग कमांडर सुबीर मित्रा आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडली. १८ जुलै रोजी सुबीर यांना एक फोन आला. कॉलरने स्वतःला एका टेलिकॉम कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने दावा केला की, सुबीरच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे आणि त्याद्वारे बेकायदेशीर कृत्ये केली जात आहेत. त्यानंतर सुबीरला व्हिडिओ कॉलद्वारे मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा कॉल आला.
कसे अडकवले जाळ्यात?
सायबर ठगांनी सांगितले की, सुबीर यांच्या नावाने एक बँक खाते उघडण्यात आले आहे, जे जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरले गेले आहे. त्यांना अटक वॉरंटदेखील दाखवण्यात आले आणि ताबडतोब मुंबईत येण्याचा दबाव टाकण्यात आला. हे ऐकून साहजिकच सुबीर घाबरले. त्यानंतर, आरोपींनी सांगितले की, जर त्याने तपासात सहकार्य केले तर अटक टाळू शकतात. परंतु यासाठी, कुटुंबासह त्यांना सतत देखरेखीखाली राहावे लागेल आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीला या प्रकरणाचा सुगावा लागू नये. अशा प्रकारे, सुबीर, त्याची पत्नी केया आणि मुलगी मालोबिका गुंडांच्या जाळ्यात अडकले.
विविध खात्यांमध्ये ३.२२ कोटी रुपये ट्रांसफर केलेदुसऱ्या दिवशी, ऑनलाइन सुनावणीचे नाटक रंगवले गेले. सुबीरला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. येथे त्यांना सांगण्यात आले की, जर त्यांना क्लीन चिट हवी असेल, तर त्यांच्या जमा भांडवलाची पडताळणी करावी लागेल. या बहाण्याने त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. सुबीरने २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत त्याच्या आयुष्यातील बचतीतून एकूण ३.२२ कोटी रुपये सहा हप्त्यांमध्ये गुन्हेगारांनी नमूद केलेल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
सुमारे एक महिना कुटुंबाने आरोपींच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले. फसवणूक करणारे त्यांना धमक्या देत राहिले की, जर त्यांनी सहकार्य केले नाही, तर अटक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. कुटुंब इतके मानसिक दबावाखाली आले की, त्यांनी कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीशी किंवा पोलिसांशी संपर्क साधला नाही. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना ३६ दिवसांत फक्त दोनदाच घराबाहेर पडू दिले.
अचानक त्यांच्याशी संपर्क अन् फसवणूक झाल्याचे समजले जेव्हा पैशाची मागणी वाढत राहिली, तेव्हा कुटुंबाला संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपींनी अचानक त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यानंतरच सुबीर आणि त्यांच्या कुटुंबाला सायबर फसवणुकीला बळी ठरल्याची जाणीव झाली. त्यानंतर मुलगी मालोबिकाने ताबडतोब एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि सायबर क्राइम पोलिस स्टेशनला या प्रकरणाची माहिती दिली. सध्या, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.