२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:00 IST2026-04-08T06:51:58+5:302026-04-08T07:00:09+5:30
अग्नेलो वालद्रिस याचे कोठडीतील मृत्यू प्रकरण

२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २०१४ मधील अग्नेलो वालद्रिस याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सात मुंबई पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खुनाचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. न्यायालयाने या प्रकरणातील कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपांना ‘घृणास्पद’ असल्याचे म्हणत त्याची गांभीर्याने दखल घेतली.
न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने विशेष पॉक्सो न्यायालयाने १७ सप्टेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेश कायम ठेवला. या आदेशानुसार, पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध खून आणि धार्मिक भावना दुखावणे या आरोपांतर्गत खटला चालविण्याचा विशेष न्यायालयाचा मार्ग मोकळा झाला. आरोपांच्या स्वरूपावरून प्रकरण गंभीर असून, त्यात कोठडीतील मृत्यूच नव्हे, तर लैंगिक अत्याचाराचेही गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या टप्प्यावर आरोप रद्द करण्याचे कारण दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
२०२२ मध्ये विशेष न्यायालयाने मुंबई पोलिस जितेंद्र राठोड, अर्चना पुजारी, शत्रुघ्न तोंडसे, सुरेश माने, रवींद्र माने, विकास सूर्यवंशी, तुषार खैरनार यांच्याविरोधात खून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप निश्चित केला. मात्र, त्या निर्णयाला आरोपींनी आव्हान दिले. न्यायालयाने आरोपींवर संशय घेण्यास जागा आहे, असे म्हणत याचिका फेटाळली.
मृत्यू प्रकरण काय आहे?
- मध्यरात्री अग्नेलो व त्याच्या साथीदारांना वडाळा पोलिस ठाण्याने एका गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. त्यांना खूप मारहाण केली. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारात अग्नेलो याचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अग्नेलोला चेकअपसाठी नेत असताना तो पोलिसांच्या हातातून सटकला.
- कुर्ला येथे रेल्वे रुळावरून पळत असताना ट्रेनला धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र, अग्नेलोचे साथीदार आणि वडिलांच्या म्हणण्यानुसार, अग्नेलोला कोठडीत पोलिसांनी खूप मारहाण केली. तशी तक्रार त्याने त्याचा भाऊ आणि डॉक्टरांकडे केली होती. त्याला मारहाण केल्याची बाब त्याच्या साथीदारांनी त्याच्या वडिलांनाही सांगितली होती.
- उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला होता. मात्र, सीबीआयनेही पोलिसांवर खुनाचा आरोप लावण्यात नकार दिला. अखेरीस विशेष न्यायालयाने स्वत:हून दखल घेत आरोपींवर खुनाचा आरोप निश्चित केला.