लग्नाची मागणी घालून तरूणाचा त्रास; विवाहितेची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:00 IST2018-08-03T15:57:38+5:302018-08-03T16:00:42+5:30

याप्रकरणी सदर महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात एका तरुणासह दोन महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Married women Suicide due to youths threatening and continuous demands for marriage | लग्नाची मागणी घालून तरूणाचा त्रास; विवाहितेची आत्महत्या 

लग्नाची मागणी घालून तरूणाचा त्रास; विवाहितेची आत्महत्या 

आखाडा बाळापूर(जि.हिंगोली) : ‘तू दिसायला खूप सुंदर आहेस,माझ्याशी शारीरिक संबंध ठेव ,आपण पळून जाऊन लग्न करू’, असे म्हणून दीड ते दोन वर्षांपासून गावातीलच तरुणाने एका महिलेस त्रास दिला. सततच्या या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सदर महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात एका तरुणासह दोन महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील मौजे साळवा येथील विवाहिता वैशाली संतोष करंडे (२५)हिने आपल्या राहत्या घरी २८ जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या महिलेला एक चार वर्षांचा मुलगा व पाच महिन्यांची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. 

याप्रकरणी प्रारंभी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु २ आॅगस्ट रोजी सदर महिलेचा पती संतोष दाजीबा करंडे याने ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार गावातील एक तरुण बापूराव उर्फ सोनू अशोकराव करंडे हा मागील एक ते दीड वर्षांपासून माझ्या पत्नीला त्रास देत होता,  तू दिसायला खूप सुंदर आहेस,माझ्याशी शारीरिक संबंध ठेव ,आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, असे म्हणून तो तिला छळत असे. त्याचा छळ असह्य झाल्याने सदर विवाहितेने ही बाब पती संतोष यांना सांगितली. संतोषने सोनू करंडे याला त्याच्या घरी जाऊन समज दिली. माझ्या पत्नीला छळू नकोस, असेही सांगितले. असे दोन ते तीन वेळा सांगूनही सोनुच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मात्र या मनस्तापातून वैशालीने २८ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली . 

या घटनेपूर्वी बापूराव करंडे, सुरेखा करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांनी वैशालीच्या घरी जावून तिच्याशी वाद घातला होता. तर 'तुझ्यामुळे आमची बदनामी होत आहे, तूच वागायला बरोबर नाहीस ,तुझी एखाद्या दिवशी गाढवावरून धिंड काढते 'असे म्हणून मारहाणही केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संतोष दाजीबा करंडे यांच्या फियार्दीवरून बापूराव उर्फ सोनू अशोकराव करंडे ,सुरेखाबाई अशोकराव करंडे, लक्ष्मीबाई मोरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत.

Web Title: Married women Suicide due to youths threatening and continuous demands for marriage