कोटद्वार - उत्तराखंडच्या कोटद्वार इथं मागील ५ जून रोजी रस्त्याकिनारी एक अज्ञात मृतदेह सापडला. हा मृतदेह दिल्लीतील वसंत कुंज येथे राहणाऱ्या रवींद्र कुमारचा असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानंतर १५ दिवस कसून तपासानंतर पोलिसांनी या रहस्यमय हत्याकांडाचा खुलासा केला आहे. या हत्याकांडाची मास्टरमाईंड रवींद्र यांची पत्नी आणि तिचा प्रियकर असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये ३४ वर्षीय रिना सिंधु असं महिलेचे नाव आहे. रिना मृत रवींद्र कुमार यांची पत्नी होती. हे दोघेही मुरादाबादच्या रामगंगा बिहार येथील परिसरात राहत होते. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी ३३ वर्षीय परितोष कुमार जो बिजनौरच्या सराय पुरैनी गावात राहायला होता. परितोष हा रिनाचा प्रियकर असल्याचे तपासात उघड झाले. तपासात समोर आले की, रवींद्र यांच्या हत्येचा कट रिना आणि तिचा प्रियकर परितोष यांनी मिळून रचला होता. या दोघांनी आधी रवींद्रला दारू पाजली, त्यानंतर फावड्याने त्यांची हत्या केली. मग मृतदेह कारमध्ये टाकून बिजनौरहून कोटद्वारला आणले. इथे रस्त्याशेजारी असलेल्या झुडपात मृतदेह फेकून ते फरार झाले.
संपत्तीची लालसा अन् अनैतिक संबंध
मुरादाबादमध्ये पती रवींद्रचे मोठे घर होते. जे त्याला विकायचे होते परंतु मी त्याविरोधात होते. त्याचवेळी फिजियोथेरेपी बहाण्याने पेशंट बनून आलेल्या परितोष कुमारसोबत रिनाची ओळख झाली. रिना आणि परितोष यांच्यात हळूहळू ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी मिळून रवींद्रचा काटा काढण्याचे ठरवले. ३१ मे रोजी रिनाने रवींद्रच्या बिजनौर येथील घरी परितोषला बोलावले. तिथे पतीला दारू पाजल्यानंतर परितोषने फावड्याने रवींद्रच्या गळ्यावर आणि छातीवर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह SUV 500 कारमध्ये टाकून कोटद्वार येथील जंगलात रस्त्याशेजारी झुडपात फेकून दिला. या हत्येसाठी वापरलेली कार नोएडा येथे सोडून ते फरार झाले.
रवींद्र यांचे वय ५६ तर रिना सिंधुचे वय ३६ वर्ष होते, रवींद्र उत्तराखंडमध्ये डोईवाला येथे भाड्याच्या खोलीत राहायचे. तिथेच त्यांची भेट रिनाशी झाली. त्यानंतर २०११ साली या दोघांनी लग्न केले होते. रिना आणि रवींद्र यांना २ मुले आहेत. त्यात रवींद्र यांनी त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून मुरादाबाद येथे एक ३ मजली बंगला खरेदी केला. ज्याची किंमत ३ कोटीच्या आसपास होती. याच घरात रिना एक फिजियोथेरेपी सेंटर चालवत होती. जिथे पहिल्यांदाच परितोष कुमारसोबत तिची ओळख झाली.
भावाच्या चिठ्ठीनं उलगडलं रहस्य
रवींद्र यांचा भाऊ राजेश कुमार यांनी १७ जूनला कोटद्वार येथील पोलिसांना तक्रार दिली. ज्यात रवींद्र यांचं २००७ मध्ये पहिले लग्न झाले होते, त्यांच्या पत्नीसोबत भांडून ते निघून गेले. तिथे रिना यांची भेट झाली आणि त्यांनी दुसरे लग्न केले. रवींद्र कधी कधी दिल्ली, हरियाणा इथे येत होता. कुटुंबाच्या संपर्कात होते. त्याच्या बंगल्याला १ लाख रुपये भाडे मिळायचे. ते बिझनेसमध्ये सतत व्यस्त होते परंतु कुटुंबाला नेहमी खुश ठेवायचे. परंतु ५ जूनला कोटद्वार पोलिसांकडून कुटुंबाला फोन आला आणि त्यांनी रवींद्र यांचा मृतदेह सापडल्याचे सांगितले. राजेश यांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे ९ मे रोजी रवींद्र यांचा १८ लाखांचा चेक बाऊन्स झाल्याने त्यांना अटकेची भीती होती. त्यांचा फोन बंद लागत होता असं रिनाने सांगितले होते. परंतु आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा भावाने घर विकून १८ लाख कर्ज फेडायची तयारी केली होती परंतु रिना त्याविरोधात होती. त्यामुळे या दोघांमध्ये वाद वाढला. त्याशिवाय रिना भावाची कार घेऊन १ आणि २ जूनला कोटद्वारला गेल्याचे समोर आले. त्यातून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार समोर आला.