डेहरादूनच्या वसंत विहार परिसरात राहणाऱ्या अरविंद कृष्ण गुप्ता यांच्या कुटुंबाची मोठी फसवणूक झाली आहे. जॉलीग्रँट विमानतळावर विसरलेलं सामान घरी मागवण्याच्या प्रयत्नात कुटुंबाने तब्बल १,६३,००० रुपये गमावले. १७ फेब्रुवारीला गुप्ता कुटुंबाचं काही सामान जॉलीग्रँट विमानतळावर राहिलं होतं. शालिनी गुप्ता यांनी गुगलवर विमानतळाचा नंबर शोधला आणि त्यावर फोन केला. विसरलेल्या सामानाबाबत माहिती दिल्यावर पलीकडून उत्तर आलं- "घाबरू नका, फक्त पाच रुपये डिलिव्हरी फी द्या, सामान घरपोच मिळेल."
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शालिनी गुप्ता यांनी यांनी UPI द्वारे पाच रुपये पाठवले. मात्र सायबर गुन्हेगारांनी सांगितलं की — "पैसे पोहोचले नाहीत, दुसऱ्या फोनवरून पुन्हा पाठवा." यावेळी गुप्ता यांनी पतीच्या मोबाईलवरून पुन्हा पाच रुपये पाठवले. दुसऱ्यांदा UPI व्यवहार होताच दोन्ही फोन हॅक झाले. बँकेशी संबंधित सर्व एप्स गायब झाले आणि सकाळी ७:२० वाजल्यापासून काही मिनिटांतच तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून एकूण १,६३,००० रुपये काढून घेण्यात आले.
सायबर गुन्हेगारांनी एकाच वेळी तीन खात्यांना लक्ष्य केलं. अरविंद कृष्ण गुप्ता यांच्या एक्सिस बँक खात्यातून ९९,००० रुपये, त्यांच्याच इंडसइंड बँक खात्यातून ८,००० रुपये आणि शालिनी गुप्ता यांच्या इंडसइंड बँक खात्यातून ५६,००० रुपये म्हणजेच एकूण १ लाख ६३ हजार रुपये सायबर चोरांनी लंपास केले. गुप्ता यांनी त्याच दिवशी सकाळी १०:४५ वाजता नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार २० फेब्रुवारीला देण्यात आली.
सायबर गु्न्हेगार गुगलवर एअरपोर्ट, रेल्वे, बँक आणि सरकारी कार्यालयांचं बनावट नंबर टाकतात. गरजू व्यक्ती गुगलवर सर्च करतात, नंबर मिळतो, फोन करतात आणि जाळ्यात अडकतात. पाच रुपयांचे आमिष दाखवून UPI ॲपची परवानगी मिळवणे आणि नंतर खातं रिकामं करणे — ही संपूर्ण पद्धत अत्यंत नियोजनबद्ध आहे. कोणत्याही सरकारी संस्थेचा नंबर गुगलवरून न घेता त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरूनच घ्यावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून UPI द्वारे एक रुपयाही पाठवू नका.