Crime News: एक ३६ वर्षांचा व्यक्ती त्याच्या चार मुलांना घेऊन रेल्वे रुळावर आला. सर्वात मोठ्या मुलाचे वय ९ वर्ष, तर सर्वात लहान मुलाचे वय तीन वर्ष. चार मुलांना घेऊन पार्कमध्ये जाण्याऐवजी तो रेल्वे जात असलेल्या एका पुलाखाली येऊन बसला. त्याने मुलांना चिप्स आणि कोल्ड्रिंग दिले. तिथे बराच वेळ वाट बघत बसला. रेल्वे येत असल्याचे बघितल्यानंतर चारही मुलांना घेतलं रुळावर जाऊन उभा राहिला. मुलं ओरडायला लागली. आणि पळण्यासाठी धडपड करू लागली. पण, बापाने त्यांना घट्ट धरून ठेवलं. मुंबईकडून अमृतसरकडे निघालेली गोल्डन एक्स्प्रेस वायू वेगाने आली आणि चिरडून गेली. चारही निष्पाप मुलांच्या चिंधड्या उडाल्यानंतर घटनास्थळावरील दृश्य पिळवटून टाकणारे होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना आहे हरयाणातील फरिदाबादमधील. मंगळवारी दुपारच्या वेळी व्यक्तीने आपल्या चार मुलांसह रेल्वे समोर उभं राहुन आत्महत्या केली. पाच जणांचाही जागेवरच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीने मुलांसाठी चिप्स आणि कोल्ड्रिंक खरेदी केले होते.
पत्नीसोबत वाद, मुलांना घेऊन आला रुळावर
मनोज महतो असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. बल्लभगडमधील सुभाष कॉलनीमध्ये तो पत्नी आणि चार मुलांसह भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, मनोज त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वाद होत. मंगळवारी (१० जून) सकाळीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुलांना पार्कमध्ये घेऊन चाललोय असे सांगून घरातून बाहेर पडला.
मुंबई-अमृतसर गोल्डन एक्स्प्रेस समोर केली आत्महत्या
जीआरपी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी जवळपास १ वाजून २० मिनिटांनी मुंबईवरून आलेली गोल्डन एक्स्प्रेस अमृतसरच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही घटना घडली. रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला मृतदेह अस्ताव्यस्थ पडलेले होते. अनेक अयवय तुटून पडले होते. पोलिसांनी सगळ्यांच्या मृतदेहाचे अवयव जमा केले.
खिशात मिळाली चिठ्ठी
मयत व्यक्तीच्या कपड्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात आधार कार्ड आणि एक चिठ्ठी मिळाली. आधार कार्डवरून त्याची ओळख मनोज महतो असल्याचे स्पष्ट झाले. तर चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या नंबर समोर लिहिलेले होते पत्नीचा नंबर. पोलिसांनी कॉल करून माहिती घेतली आणि चौघांची ओळख पटली.
पोलिसांनी महिलेला कॉल केला आणि विचारले की, मनोज तुमचा कोण लागतो? महिलेने सांगितले की, ते माझे पती आहेत. ते मुलांना पार्कमध्ये घेऊन गेले आहेत. पोलीस महिलेला म्हणाले की, रेल्वे रुळाकडे या अपघात झाला आहे. महिलेने विचारले कसा झाला? पोलिसांनी सांगितले की, रेल्वे अपघात झाला आहे.
त्यानंतर महिला घटनास्थळी आली. पती आणि चार मुलांचे तुकडे तुकडे झालेले मृतदेह बघून हंबरडा फोडला. हे दृश्य बघून महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला शुद्धीवर आणण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.