उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहित वधू तिच्या पतीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली आणि संधीचा फायदा घेत फरार झाली. ही घटना जिल्ह्यातील मुगलसराई कोतवाली भागात घडली आहे. पती शमशेर चौहान याने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शमशेर चौहान हा सैदपुरा गावचा रहिवासी आहे. ४ जून रोजी त्याचं लग्न मवाई खुर्द गावातील रहिवासी खुशीशी झालं होतं. लग्नानंतर घरात आनंदाचे वातावरण होतं, परंतु १४ जून रोजी सर्व काही बदललं. शमशेरने सांगितलं की, त्या दिवशी पत्नीने डोकं दुखत असून तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितलं. औषध घेतल्यानंतर खुशीने शॉपिंगला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती तिच्या पतीसोबत पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर बाजारात गेली.
बाजारात खरेदी केल्यानंतर दोघेही काली माता मंदिराजवळील एका रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी गेले. रेस्टॉरंटमध्ये समोसे ऑर्डर केल्यानंतर, खुशीने तिला वॉशरूममध्ये जायचं असल्याचं सांगितलं आणि वरच्या मजल्यावर गेली. बराच वेळ ती परत आली नाही तेव्हा शमशेरने चौकशी केली आणि तिला शोधण्यासाठी रेस्टॉरंटच्या तिसऱ्या मजल्यावर गेला, परंतु खुशी कुठेही सापडली नाही.
सगळीकडे शोधल्यानंतरही जेव्हा त्याला त्याची पत्नी सापडली नाही तेव्हा शमशेर घरी परतला आणि त्याने आपल्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबासह, शमशेरने पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता पत्नीची तक्रार दाखल केली. खुशी तिच्या माहेरीही पोहोचली नसल्याचंही समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.