हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 20:23 IST2025-06-01T20:22:17+5:302025-06-01T20:23:56+5:30
हे जोडपे ज्या ठिकाणाहून गायब झाले तिथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. या पावसामुळे शोधमोहिमेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
मध्य प्रदेशातील इंदूरमधून हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे रहस्यमयपणे गायब झाले असून मागील ९ दिवसांपासून त्यांचा कुठलाच सुगावा पोलिसांना लागलेला नाही. इंदूर पोलीस सातत्याने शिलांग पोलिसांच्या संपर्कात आहे. इंदूर पोलिसांची एक टीम शिलांगला पोहचली आहे. आतापर्यंत गायब झालेल्या जोडप्याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.
इंदूरला राहणारा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत शिलांगला हनीमूनसाठी गेले होते. परंतु अचानक ते शिलांगपासून ३० किमी अंतरावरील ओयरा हिल्स येथून गायब झाले. त्यानंतर ९ दिवसांपासून त्यांचे नातेवाईक शिलांगच्या ओयरा हिल्स येथील दऱ्याखोऱ्यात या दोघांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी इंदूर पोलीस आणि शिलांग पोलीस शोधमोहिम राबवत असून मध्य प्रदेश आणि मेघालयचे मुख्यमंत्रीही एकमेकांच्या संपर्कात आहेत.
हे जोडपे ज्या ठिकाणाहून गायब झाले तिथे काही दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. या पावसामुळे शोधमोहिमेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. इंदूर पोलिस शिलांगमध्ये शोध घेत असून त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नातेवाईक संपर्कात आहेत अशी माहिती इंदूरचे डीसीपी राजेश त्रिपाठी यांनी दिली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन हे दोघेही राजा-सोनमचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, राजा पत्नी सोनमसह हनीमूनसाठी शिलांगला आले होते. २३ मे रोजी राजा यांचं त्यांच्या आईसोबत अखेरचे बोलणे झाले. तेव्हापासून हे दोघे बेपत्ता आहेत.
Indore, Madhya Pradesh: An Indore-based couple has been missing for nine days in Shillong
— IANS (@ians_india) June 1, 2025
DCP Rajesh Tripathi says, "I have been in continuous contact with their family members and I have also been discussing the situation daily with the local police superintendent of Shillong.… pic.twitter.com/WryxL2ya9b
हे जोडपे २२ मे रोजी मावलखियात गावात पोहचले होते आणि तिथून भाड्याने स्कूटर घेत नोंग्रियात गावातील लिविंग रूटब्रिज पाहण्यासाठी गेले होते. तिथे एका होम स्टेमध्ये ते थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. २४ मे रोजी त्यांची स्कूटर शिलांग सोहरा मार्गावरील एका कॅफेजवळ बेवारस अवस्थेत आढळली. मेघालयात अनेक भागात पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे या दोघांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जिथून हे दोघे बेपत्ता झाले ती जागा चेरापूंजी नावाने ओळखली जाते. याठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. चुनखडीपासून बनवलेल्या गुहेच्या भिंती, जंगल अशी ही जागा आहे.