गूढ वाढलं! संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:51 IST2025-03-31T15:50:19+5:302025-03-31T15:51:25+5:30
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं दमानिया यांनी सांगितले.

गूढ वाढलं! संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या?
मुंबई - बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित एका महिलेची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या महिलेची ५ दिवसापूर्वी हत्या झाली. घटनास्थळी पोलिसांनी पोस्टमोर्टम केले. शनिवारी बीड पोलीस कळंबमध्ये गेल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना कळली. अनैतिक संबंध की पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही हत्या झाली का असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
कळंबच्या द्वारकानगर येथील एका घरात या महिलेची हत्या झाली. या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांकडून जागेवरच पोस्टमोर्टम करून लगेचच अंत्यविधी उरकण्यात आला असं दमानिया यांनी म्हटलं आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय की, गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या झाली आहे. संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसापूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलिसांना ही बातमी कळाली अन ते घटनास्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना घटना कळली. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
गुड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?
संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय.
या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी…
त्याशिवाय या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे.शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला व मृतदेह सडलेला असल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले. अंत्यविधीही उरकला. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई, मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावांचा वापर करायची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, द्वारकानगरीत मनीषा बिडवे नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे पोहचलो. तेव्हा घरच्या दरवाजाला कुलूप होते. आम्ही मागील दरवाजाने आतमध्ये गेल्यानंतर तिथे महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेचा पोस्टमोर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. ही महिला संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत खात्रीशीर माहिती नाही. पोलीस तपास सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.