जि.प. शाळांची पटसंख्या ऐरणीवर

By Admin | Updated: June 22, 2016 00:55 IST2016-06-22T00:36:14+5:302016-06-22T00:55:57+5:30

औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने

Zip The number of schools on the anvil | जि.प. शाळांची पटसंख्या ऐरणीवर

जि.प. शाळांची पटसंख्या ऐरणीवर


औरंगाबाद : खाजगी शाळांनी गावागावांत जाऊन विद्यार्थी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या एकाही शिक्षकाने किंवा शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यांच्या अशा अनास्थेमुळे अनेक शाळांना कुलूप लागण्याची वेळ आली आहे. शिक्षकाअभावी रोज वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये पालक शाळा भरवीत आहेत. तरीही शिक्षणाधिकाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. अशा अकार्यक्षम शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरली.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, अलीकडेच बदल्यांची प्रक्रिया राबवली आहे. काही शिक्षक अजूनही बदली झालेल्या शाळेत रुजू झालेले नाहीत. सध्या हाती घेण्यात आलेली पदोन्नतीची प्रक्रिया आटोपल्यानंतर शाळानिहाय शिक्षकांची स्थिती काय आहे, यासंबंधीचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवून घेतला जाईल. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे, ही बाब खरी आहे.
यासंदर्भात आपण प्रवेश पंधरवडा राबवत आहोत. यापूर्वी जिल्ह्यांतील शाळांमध्ये असलेली विद्यार्थी संख्या आणि प्रवेश पंधरवडा राबविल्यानंतरची विद्यार्थी संख्या, या संबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना दिले.
बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा मुद्दा चर्चेला आणला. ते म्हणाले की, मी स्वत: माझ्या सर्कलमधील विविध शाळांना भेटी देत आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत एकदाही शिक्षणाधिकाऱ्यांनी एकाही शाळेला भेट दिली नाही. त्यांनी विद्यार्थी मिळविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख किंवा शिक्षकांना सांगितले नाहीत.
आजही अनेक शाळांना शिक्षक नाहीत. यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले; पण त्यांनी सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. सदस्य मनाजी मिसाळ, दीपकसिंह राजपूत, शैलेश क्षीरसागर, पुष्पा जाधव, मनोहर गवई, पुष्पा केंदारे यांनीही शिक्षणाधिकारी कोणत्याही तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप
केला.
शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी पैठणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर पैसे घेऊन नांदर जि.प. शाळेत शिक्षक भरल्याचा खळबळजनक आरोप केला. त्या शाळेतील एका शिक्षकाचे अपघाती निधन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेवर पैसे घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, असे ते म्हणाले.
अनेक शाळांवर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; पण तेथे शिक्षक नाहीत, तर दुसरीकडे अनेक शाळा अशाही आहेत की तिथे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्या शाळांमध्ये मात्र शिक्षक जास्तीचे आहेत. जिथे शिक्षकांची गरज आहे, अशा शाळांमध्ये शिक्षकांना पाठविण्याबद्दल वारंवार गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले जाते. मात्र, ते ऐकत नाहीत. गटशिक्षणाधिकारी शिक्षकांना का जपतात, हेच कळत नाही, असे तांबे म्हणाले.

Web Title: Zip The number of schools on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.