तरुणाईची सुरक्षा ‘पाण्यात’!
By Admin | Updated: June 2, 2015 00:36 IST2015-06-02T00:21:57+5:302015-06-02T00:36:31+5:30
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे

तरुणाईची सुरक्षा ‘पाण्यात’!
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पारा चाळिशी पार करीत असल्याने शहरातील जलतरण तलावांवर अलोट गर्दी होत आहे. यामध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक असली तरी एकाही जलतरण तलावावर सुरक्षेसंबंधीचे उपाय करण्यात आले नाहीत. रविवारी हर्सूल तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील सर्वच जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महापालिकेतर्फे सिद्धार्थ उद्यानाच्या पाठीमागे जलतरण तलाव चालविण्यात येतो. त्याचप्रमाणे ज्योतीनगर येथेही मनपाच्या जागेवर बीओटीवर जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. हर्सूल येथेही खाजगी जलतरण तलाव अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. याशिवाय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पाचपेक्षा अधिक तलाव आहेत. बहुतांश तलावांवर नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. नवीन पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मागण्यात येत नाही. अनेकांना फिटस्चा त्रास असतो. तलावावर येणारे तरुण याची माहितीच देत नाहीत. त्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडतात. मनपा हद्दीत सुरू असलेल्या जलतरण तलावांसाठी प्रशासनाने कोणतीही नियमावली आजपर्यंत तयार केलेली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे जलतरण तलाव चालविणाऱ्यांवर कोणचाही अंकुश राहिलेला नाही.
पोेहण्याची हौस अनेकांना असते. या हौसेखातर मित्रांसोबत अनेक जण येतात. आल्यानंतर पोहता येते किंवा नाही याचीही माहिती देत नाहीत. येत नसेल तर लहान हौदात पोहत नाहीत. थेट मोठ्या हौदात जाण्याचा प्रयत्न करतात. लाईफ गार्ड किंवा प्रशिक्षकाची मदत अनेक जण घेतच नाहीत. सोबत आलेल्यांच्या भरवशावर पोहण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेकदा दुर्घटना होण्याची शक्यता असते. नागरिकांनीही अधिक काळजी घेतल्यास दुर्घटना घडणारच नाही. -धनंजय फडके, प्रशिक्षक