कृषी प्रक्रिया उद्योगातून तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:04 IST2021-08-22T04:04:57+5:302021-08-22T04:04:57+5:30

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील ...

Young people should become self-sufficient in the agro-processing industry | कृषी प्रक्रिया उद्योगातून तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे

कृषी प्रक्रिया उद्योगातून तरुणांनी स्वयंपूर्ण व्हावे

औरंगाबाद : शेतीवर आधारित पूरक उद्योग, अन्न व फळ पॅकेजिंग या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील तरुणांनी कृषी आधारित प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची गरज कृषी उद्योजक, तज्ज्ञांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विलासराव देशमुख अध्यासन केंद्रातर्फे कृषी उद्योजकता विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. या परिसंवादाचे उद्घाटन नॅचरल शुगर्सचे संस्थापक बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठोंबरे म्हणाले, कृषिप्रधान व्यवस्थेच्या विकासातूनच राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे, याची जाणीव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना होती. म्हणून त्यांनी राज्याच्या विकासाच्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य दिले. कृषी आणि सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी शेती, सहकार व शिक्षणाच्या क्षेत्रात लातूर पॅटर्न विकसित केले.

कृषितज्ञ उदय देवळाणकर म्हणाले, कोरोनानंतर जगात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर नव्याने विचार सुरू झाला आहे. त्यामुळे तेलबिया आणि डाळ उत्पादन करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याकडे तेल बिया आणि डाळी उत्पादनाची ताकद आहे.

नेटिव्ह कोंबक बांबूचे संस्थापक संजीव कर्पे म्हणाले, राज्यातील आठ टक्के पडीक जमीन व १० टक्के कमी उत्पादन देणारी शेतजमीन बांबू लागवडीखाली आणल्यास ३० लक्ष हेक्टरवर बांबू लागवड होईल. विदर्भात जवळपास १२.५ लक्ष हेक्टरवर वनशेती व बांबू लागवड केली जाऊ शकते. भीमा बांबू, तुरडा, नूटन, पालीमार्फा, कटांग या उच्च उत्पादन देणाऱ्या बांबूच्या प्रजाती आहेत. यांची लागवड केल्यास हेक्टरी ५० ते ५५ टन उत्पादन मिळविणे शक्य असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. स्मिता अवचार, डॉ. भगवान साखळे यांची उपस्थिती होती. अध्यासन केद्राचे संचालक डॉ. राम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. किरण रेड्डी याने सूत्रसंचालन, तर डॉ. गणेश बडे यांनी आभार मानले.

Web Title: Young people should become self-sufficient in the agro-processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.