यंदा बदल्यांसाठी दबावनीती ‘फेल’

By Admin | Updated: June 9, 2016 23:53 IST2016-06-09T23:49:34+5:302016-06-09T23:53:52+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे.

This year 'pressure' | यंदा बदल्यांसाठी दबावनीती ‘फेल’

यंदा बदल्यांसाठी दबावनीती ‘फेल’

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी अनेकदा निवेदने देऊन, उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी नवीन संघटनाही स्थापन केली. त्या माध्यमातून दबावाचे राजकारण केले; पण ते सारे व्यर्थ गेल्याची भावना आता शिक्षकांची झाली आहे.
३० मे ते ७ जूनदरम्यान जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषण केले. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना द्या, या एकाच मागणीसाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषणाला गर्दी केली. तेव्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षकांची पदे रिक्त नसल्यामुळे सद्य:स्थितीत तरी आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना देणे शक्य नाही, असे कळविले. तरीदेखील शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवले. अखेर ६ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपोषणार्थी शिक्षकांना एका पत्राद्वारे कळविले की, जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल. त्यानुसार काही पदे रिक्त झालीच तर त्यावर किंवा बिंदू नामावलीनुसार रिक्त बिंदूचा ताळमेळ घालून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना पदस्थापना दिल्या जातील. येथून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे जवळपास ५०० ते ७०० शिक्षक आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी कार्यालयाने नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा दिलेले आहे; पण राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणारे शिक्षक येथेच कार्यरत राहिले. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास ५०० आहे. जिल्ह्यात सहशिक्षकांची ६ हजार ८९७ एवढी पदे मंजूर असून, सध्या ६ हजार ७३१ सहशिक्षक कार्यरत आहेत. मंजूर पदांच्या प्रमाणात रिक्त पदे शिल्लक नाहीत.
अलीकडेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली. आता १५ जूनपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया प्रस्तावित आहे. पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या पदांचा बिंदू नामावलीनुसार ताळमेळ घालून रिक्त होणाऱ्या बिंदूवर नियमानुसार आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना सामावून घेण्याची कार्यवाही करण्यास शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवली आहे.
एकीकडे जिल्ह्यात शिक्षकांच्या जागाच रिक्त नाहीत. पदोन्नतीमुळे काही जागा रिक्त होतील, पण रिक्त होणाऱ्या जागांवर बिंदू नामावलीनुसार शिक्षकांना सामावून घेतल्यास बोटावर मोजण्याएवढ्याच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी मिळू शकेल.

Web Title: This year 'pressure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.