यंदा आंतरपिकावर भर !
By Admin | Updated: June 23, 2016 01:17 IST2016-06-23T00:13:02+5:302016-06-23T01:17:28+5:30
राजेश खराडे , बीड पारंपारिक पीकपद्धती आणि दरवर्षी कापूस उत्पादनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर यासारख्या आंतरपिकातील कडधान्यावर भर दिला आहे

यंदा आंतरपिकावर भर !
राजेश खराडे , बीड
पारंपारिक पीकपद्धती आणि दरवर्षी कापूस उत्पादनातून होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, तूर यासारख्या आंतरपिकातील कडधान्यावर भर दिला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा आंतरपिक पिक लागवडीच्या बियाणांची मागणी वाढलेली आहे.
जिल्ह्यात खरिपात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचेच अधिकचे उत्पादन घेतले जाते. २००४-०५ साली कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ६० हजारावर होते गतवर्षी ४ लाख २० हजारावर गेले होते. दहा वर्षाच्या कालावधीत कापसाच्या क्षेत्रात तीपटीने वाढ झाली होती तर कडधान्याच्या उत्पादनात निम्म्याने घट. तब्बल दहा वर्षानंतर शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत आहे.
सुरवातीच्या काळात मोजक्या शेतकऱ्यांनाच कपाशीतून मोठे उत्पन्न मिळाले, मात्र एकाच पिकाचे सातत्य ठेवल्याने जमिनीचा दर्जा ढासळला शिवाय उत्पादनातही घट होत आहे. गेल्या दोन वर्षापासून कापसातून तर फायदा तर लांबच उत्पादनावर झालेला खर्चही निघेना झाला आहे. यातच हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पीकपद्धतीमध्ये बदल करण्याचे आव्हान कृषिविभागाच्या माध्यमातून केले जात होते, मात्र याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. पर्जन्यमानाच्या अनियमिततेमुळे कापूस अािण सोयाबीन ही पिके बेभरवाशाची झाली आहेत. त्यामुळे दरवर्षी होणारा धोका टाळण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी आंतरपिकावर अधिक भर दिला आहे. पाण्याअभावी एका पिाकचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकातून उत्पादन पदरी पाडून घेण्याच्या दृष्टीने मूग, उडीद, तुरीचा पेरा यंदा वाढला आहे. शिवाय कापूस लागवडीने शेतजमिन गुंतून पडत राहते परिणामी रबीकरीता क्षेत्र हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांची मानसिकता बदलत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पेरणीचा टक्का १६ वर गेला आहे. सर्वसाधारण खरीपक्षेत्र ६ लाख ५८ हजार असताना अद्यापर्यंत ९० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. पैकी ५० हजारावर कापूस, सोयाबीन व उर्वरीत क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आली आहे.
कडधान्यात तुरीच्या जोडीला नगदी पिके म्हणून मूग, उडिद, हुलगे, मटकीचे उत्पादन घेतले जात आहे. गेवराई तालुक्यात बाजरी-तूर- मटकीचे असे तिहेरी पिक लागवडीची पद्धत अवलंबली असल्याचे चित्र आहे.