कामगार, कुटुंबियांची होतेय हेळसांड

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:18+5:30

शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर वाळूज औद्योगिक परिसरातील राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा रुग्णालयाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’, अशी झाली आहे.

Workers and family members are helpless | कामगार, कुटुंबियांची होतेय हेळसांड

कामगार, कुटुंबियांची होतेय हेळसांड

शेख महेमूद तमीज,
वाळूज महानगर
वाळूज औद्योगिक परिसरातील राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा रुग्णालयाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’, अशी झाली आहे. कामगारांच्या वेतनातून दरमहा कोटी रुपये जमा होऊनही या रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे जवळपास १ लाख कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
कामगार व त्यांच्या कुंटुबियांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने राज्य कामगार विमा योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी कामगारांच्या वेतनाच्या दरमहा ६.५ टक्के रक्कम कपात केली जाते. ही कपात केलेली रक्कम ईएसआयसीच्या तिजोरीत जमा होऊनही कामगारांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत.
वाळूज औद्योगिक परिसरात जवळपास १ लाख कामगार व त्यांचे कुटुंबीय विमाधारक योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी बजाजनगरमध्ये सेवा रुग्णालय सुरू झालेले आहे. या सेवा रुग्णालय इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.
पावसाळ्यात ती गळते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास सोसावा लागतो. या रुग्णालयात प्रवेश करताच आपण रुग्णालयात आलो की गोदामात, असा प्रश्न रुग्णांना पडतो. इमारतीत सर्वत्र अस्वच्छता व कचरा साचलेला दिसतो. कामगार रुग्णांच्या केस पेपरचे गठ्ठे पडलेले दिसतात. इमारतीवर मोबाईल कंपन्यांचे चार मनोरे असून इमारत मोडकळीस आली आहे.
रोज ७०० ते ८०० रुग्णांची तपासणी
या रुग्णालयात रोज ७०० ते ८०० रुग्ण येतात. डॉक्टर्स जुजबी तपासणी करून त्यांना परत पाठवतात. केवळ तासाभरात ५० ते ६० रुग्णांची तपासणी केली जात असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही तणावाखाली काम करावे लागते.
या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार करून रुग्णांना विमा कामगार योजनेच्या चिकलठाणा तसेच शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टर देत असल्याचे रुस्तुम बिबे, सुनील साळुंके, संजय करपे, गीता राजपूत या विमा लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
५० टक्के रिक्त पदे
या सेवा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची २७ पदे मंजूर आहेत. मात्र, सद्य:स्थितीत केवळ तीन डॉक्टर, नर्स, ड्रेसर, दोन फार्मासिस्ट, क्लार्क व चार चतुर्थश्रेणी कर्मचारी, असे १२ जण कार्यरत आहेत. डॉक्टर व काही कर्मचारी रजेवर गेल्यावर आरोग्य सुविधा पुरती कोलमडते.
याविषयी राज्य कामगार विमा योजनेच्या आयुक्त सीमा व्यास यांच्याशी संपर्क साधला असता, मी मीटिंगमध्ये असल्याचे सांगून त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.
रुग्णालयाचे स्थलांतर करा
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्या तुलनेत कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अनेकदा मागणी करून उपयोग होत नाही. बजाजनगरातील सेवा रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली असून, उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कामगार रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी हे रुग्णालय चांगल्या इमारतीत स्थलातंरित करावे; अन्यथा कामगार संघटनाआंदोलन करील.
-प्रकाश जाधव, सरचिटणीस, ईएसआयधारक कामगार संघटना
रुग्णांची हेळसांड थांबवा
या सेवा रुग्णालयात रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे कामगार रुग्णांना खाजगी रुग्णालयात खर्चिक उपचार घ्यावे लागतात. आमच्या वेतनातून दरमहा रक्कम कपात होऊनही किमान पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे ईएसआयसीकडे जमा होणारा निधी नेमका कुठे जातो, असा प्रश्न आहे.
-बाळासाहेब दातरंगे
(कामगार रुग्ण)
सर्व रुग्णांना एकच औषध
या सेवा रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, डॉक्टर तपासणीचा केवळ देखावा करून आलेल्या सर्वच रुग्णांना एकाच प्रकारचे औषध देतात. रुग्णांना वेगवेगळा त्रास होऊनही डॉक्टर मंडळी आलेल्या रुग्णांना एकसारखीच औषधी देत असल्यामुळे डॉक्टरांना आजाराचे नेमके निदान नाही, असे रुग्णांना वाटते.
-विलास शेंगुळे (कामगार)ं

Web Title: Workers and family members are helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.