२६२ गावांत रखडली ‘जलयुक्त’ची कामे
By Admin | Updated: May 22, 2016 00:04 IST2016-05-21T23:56:05+5:302016-05-22T00:04:47+5:30
लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़

२६२ गावांत रखडली ‘जलयुक्त’ची कामे
लातूर : सिंचन क्षेत्रामध्ये वाढ व्हावी म्हणून कृषी विभागामार्फत लातूर जिल्ह्यात २०२ गावात जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली़ यातील १०५ गावातील कामे पूर्ण झाली आहेत़ तर ९७ गावात अजूनही कामाला मुहूर्त लागला नाही़ पहिल्या टप्प्यातील कामे रखडलेली असताना कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत नवीन वर्षातील गावाची निवड केली आहे़ सध्या २६२ गावात जलयुक्तची कामे रखडली आहेत़
कृषी विभागाने २०१४-१५ साठी लातूर तालुक्यातील २८, रेणापूर तालुक्यातील १६, औसा ३५, निलंगा ३१, शिरुर अनंतपाळ ९, उदगीर २२, जळकोट १०, देवणी ११, अहमदपूर २२, शिरुर अनंतपाळ ९ अशा एकूण २०२ गावांची निवड केली़
निवडलेल्या २०२ गावात कंपार्टमेंट बल्डींग, माती नाला बांध, सिमेंट बंधारे दुरुस्ती, एटी वेअर दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, गॅबियन बंधारे, वृक्ष लागवड, समतल चर, रिचार्ड शाफ्ट अशी २८ प्रकारची कामे सुरु करण्यात आली आहेत़ यातील एकूण गावांपैकी १०५ गावातील जलयुक्तची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरीत गावांपैकी ३५ गावात ५० टक्केपेक्षा जास्त कामे झाली आहेत़
जूनअखेर पाण्याच्या ताळेबंदानुसार १५० गावातील कामे पूर्ण होतील असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जात असला तरी हे उर्वरीत कामे रखडली असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहेत़ त्यातच २०१५-१६ च्या नवीन कामाची निवड करून त्याही गावातील कामाला गती देण्यात आली आहे़ मागील वर्षी मंजूर करण्यात आलेली कामे अपुरी असताना नवीन वर्षातील कामे सुरु केलीच कशी असा प्रश्न शेतकरी नागरिकांतून उपस्थित केला जात आहे़
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील २०२ गावात २०१४ - १५ मध्ये कामे सुरु केली आहेत़ ही कामे पूर्ण झाली नाहीत तोवरच नवीन गावाची निवड करण्याची घाई कृषी विभागाने केली आहे़ परंतू, गत वर्षीच्या कामासाठी जून अखेरची डेडलाईन दिली असतानाही नवीन गावे निवडल्याने कृषी विभागाचा अनागोंधी कारभार दुष्काळी परिस्थितीतही समोर आला असल्याचे शेतकरी भरत जाधव म्हणाले़
जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून निवड केलेल्या एकूण गावापैकी ४५ गावातील कामे लोकसहभागातून सुरु आहेत़ या कामातही सातत्य ठेवले असल्याने भविष्यात या गावातील सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक प्रतापसिंह कदम म्हणाले़