२५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम रखडले

By Admin | Updated: June 9, 2014 00:12 IST2014-06-08T23:30:46+5:302014-06-09T00:12:13+5:30

जालना: पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील २५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे.

Work on 257 AWCs | २५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम रखडले

२५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम रखडले

जालना: पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील २५७ अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. त्यासाठीचा ६ कोटींचा निधी पडून असून विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोठे बसविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात एकूण अंगणवाड्यांची संख्या १९५४ आहे. २०१०-११ पासून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना इमारत बांधकाम करण्यासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे. आतापर्यंत बहुतांश अंगणवाड्यांच्या इमारतींचे काम झालेले असून केवळ २५७ अंगणवाड्यांचे काम शिल्लक आहे. सन २०१३-१४ अंतर्गत या अंगणवाड्यांसाठी ११ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र पूर्वी एका अंगणवाडीच्या इमारतीसाठी शासनाकडून साडेचार लाख रुपयांचा निधी दिला जात होता. गेल्या तीन-चार महिन्यांपासून शासनाच्या सुधारित निर्णयानुसार एका अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी सहा लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. जिल्हा परिषदअंतर्गत ५ लाखांपेक्षा अधिक खर्चाची कामे ई-टेंडरींगद्वारे केली जातात. परंतु ज्या अंगणवाड्यांसाठी सहा लाखांचा निधी मंजूर झाला, त्यापैकी काही ग्रामपंचायतींनी ई-टेंडरींग प्रक्रियेस अनास्था दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. तर ज्या अंगणवाड्यांसाठी साडेचार लाखांचा निधी मंजूर आहे, त्या ग्रामपंचायतींनी सहा लाखांचा निधी देण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाची भूमिका शासन निर्णयानुसार ठाम असल्याने इमारतींचे बांधकाम करण्यास काही ग्रामपंचायतींकडूनच तयारी होत नसल्याचे दिसून येते.
प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून ग्रामपंचायतींनी आपली मागणीही रेटून धरल्याचे समजते. त्यामुळे इमारतींच्या बांधकामासाठीचा निधी मात्र पडून आहे.
मे महिन्यात झालेल्या जि.प. स्थायी समितीच्या सभेत काही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रशासनाच्या संथ कार्यवाहीमुळेच हा निधी पडून असल्याचा आरोपही सदस्यांनी केला होता. पावसाळा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अंगणवाड्यांच्या इमारतींचे बांधकाम लवकर व्हावे, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कामांसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया वगळण्याचा सूर
ग्रामपंचायत पातळीवरून या अंगणवाड्यांचे बांधकाम होत असल्याने पूर्वी साडेचार लाखांचे अनुदान असताना ई-टेंडरींग प्रक्रिया नव्हती. आता सहा लाखांचे अनुदान एका अंगणवाडी इमारतीसाठी मंजूर झाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे ई-टेंडरींग प्रक्रिया आवश्यक आहे. ती वगळावी, असा सूर काही ग्रामपंचायतींकडून लावला जात आहे.
ग्रा.पं.कडून सहकार्याची अपेक्षा - गव्हाड
याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शीतल गव्हाड म्हणाल्या, जिल्ह्यात केवळ २५७ अंगणवाड्यांच्या इमारतीचे काम शिल्लक असून पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन इमारतींचे बांधकाम करून घेणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर आपलाही पाठपुरावा सुरू असून सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सभापती गव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Work on 257 AWCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.