वन्यप्राण्यांची तहान टँकरवर !
By Admin | Updated: July 24, 2015 00:49 IST2015-07-24T00:16:28+5:302015-07-24T00:49:37+5:30
बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

वन्यप्राण्यांची तहान टँकरवर !
बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. चारा- पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मागील चार महिन्यांपासून टँकरच्या पाण्यावर प्राण्यांची तहान भागविण्याची वेळ वनविभागावर आली आहे.
जिल्ह्याचे वनक्षेत्र २२ हजार ९७५ हेक्टर इतके आहे. या वनक्षेत्रात ब्लॅकबप, रानडूकरे, मोर, ससा, तडस, लांडगे, कोल्हे, काळवीट आदी प्राणी वास्तव्यास आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे वनक्षेत्रातील चारा, पाणी जूनपर्यंत पुरला नाही. एप्रिल महिन्यातच टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वनविभागाने प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली. वनक्षेत्रामध्ये ६७ कृत्रिम तर २२ नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामध्ये हे पाणी साठवून ठेवले जात आहे. पाच ते १२ हजार लिटर्स इतकी साठवण क्षमता असलेल्या पाणवठ्यांमध्ये साठविलेल्या पाण्यावर प्राण्यांना तहान भागवावी लागते.
टँकरचे पाणी उपलब्ध न झाल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान, टँकरवर महिन्याकाठी ते २५ ते २८ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो.
गेल्या चार महिन्यांत सव्वा लाख रुपये खर्च झाला असल्याचे उपविभागीय वनाधिकारी आर. आर. काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)